Sunday, May 2, 2021

उतावीळ नवरे

               जगात उतावीळ नवऱ्यांची कमी नसते.आता बघा ना- बंगाल निवडणुकीआधी सोशल मीडियावर मोदी -शहांच्या सभांची जी चित्रणे पसरवली जात होती त्यावरूनतर तृणमूलच्या अर्ध्या उमेदवारांचे डिपॉसिट जप्त होईल असा ग्रह बरेच जण करून बसले होते. आता फक्त मुख्यमंत्री निवडायचा ( म्हणजे मोदी -शहांनी ) आणि सत्ता आपलीच अशाच अविर्भावात होते. आता "सत्ता आपलीच" मध्ये 'आपण' ची व्याख्या म्हणजे एक गंमतच आहे. महाराष्ट्रातील संगमनेर तालुक्यातील इळपुंजे गावातील कुक्कुटपालन केंद्रात कंत्राट पद्धतीने काम करणारा  गणू कोथमिरे, शेकडो मैल लांब कोलकोत्यात कोणी घोष किंवा चॅटर्जी मुख्यमंत्री होणार म्हणून नाचत सुटतो. का ? तर भाजपा सत्तेत आली आणि हा गणू लहानपणी तीन महिने शाखेत गेला होता एवढाच काय तो त्यांचा संबंध ! असोकोणी कशामुळे खुश व्हायचे हा ज्याचा त्याचा निर्णय. परंतु निकाल मात्र बरोबर उलटे लागलेत. निवडणुकीआधी २०० चा टप्पा पार करणार असे शहा विश्वासाने सांगत होते. अर्थात आपल्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे मनोबल वाढविणे हे त्यांचे कामच आहे. आपली खरी मजल कुठपर्यंत जाईल याचा त्या धूर्त राजकारण्याला अंदाज असणारच निश्चित. परंतु वाढवून अंदाज सांगणे, संभांचे मॉर्फ केलेले अतिरंजित छायाचित्रे प्रदर्शित करणे हे सगळे आधुनिक डावपेच वापरले गेले. गैर काहीच नाही. एवढेच कि त्या जाळ्यात काही समर्थकच अडकले आणि आता सत्ता आपलीच असा ग्रह करून बसले. मोदी-शहांनी अगदी व्यावसायिक ( प्रोफेशनल ) रित्या डावपेच आखले,पूर्ण सामर्थ्य पणाला लावले , कष्ट घेतले आणि सत्ता खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. एका सच्च्या राजकारण्याला साजेल असा.निवडणुका झाल्यावर आपल्या पुढच्या उद्योगाला रिकामे. उगाच का आणि कसे -हे रतीब घालायला वेळ पण नाही आणि तूर्त गरज पण नाही. अर्थात मुळात मोदींनी इतकी शक्ती निवडणूकांमागे लावायला हवी होती का ? हा प्रश्न उरतोच. दरम्यानच्या काळात कोरोनाने रौद्र रूप धारण केले .परंतु तो वेगळा विषय आहे. या लेखामध्ये तरी आम्ही त्यात जाऊ इच्छित नाही. थोडक्यात आता बंगाल मध्ये भगवा फडकणार म्हणून गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेवांचा पोपट झाला. भाजपने  शंभरचा आकडा ओलांडला तर आपण हा व्यवसाय सोडून देऊ असे जेंव्हा प्रशांत किशोर म्हणाले होते तेंव्हा अनेकांनी ( कदाचित शहांच्या २०० वर विश्वास ठेवून ) त्याची येथेच्छ टवाळी केली होती. शेवटी किशोर यांनी आपल्या व्यवसायाला राम राम ठोकलाच. परंतु तृणमूलला दोनशे च्या पार नेऊन !

              निवडणुकांचे निकाल पूर्णपणे जाहीरही झाले  नाहीत तर काहीजण मोदींना सत्तेवरून दूर करण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. गम्मत म्हणजे स्वतःच्या पक्षाने भोपळाही फोडला नसला तरी भाजपच्या पराभवाचा आनंद साजरा केला जात आहे. सांगलीतील हातकणंगल्याचा सदा पाटील "आता मोदीचा काय खरा नाय " म्हणून डरकाळी फोडतो. का तर कोण काळी साहेबांनी चालता चालता " काय बरा  हाय ना " असं विचारलं होतं म्हणे ! दुश्मन का दुश्मन अपना दोस्त म्हणत गल्ली मोहोल्ल्या बाहेर किंमत नसलेले नेते आणि पक्ष सुद्धा मोमोता दीदींना अभिनंदनाचे संदेश पाठवत आहेत.भाजपच्या अधिसत्तेला सुरुंग लागले , मोदींना आता अवघड जाणार , २०२४ मध्ये मोदी विरुद्ध ममता ? असले संदेश सोशल मीडियावर येऊ लागले आहेत. परंतु या अति उत्साहींना कळत नाही. मुळात मोदी आणि मोमोतांना पुढील वर्षेतरी वैर ठेवण्याचे काहीच कारण नाही. आणि दोघेही अगदी व्यवहारी राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी हातमिळवणी केली तरी आश्चर्य वाटायला नको ! मोदींविरुद्ध मोट बांधायची म्हंटली तर दीदी येतील पण. परंतु इतर पक्ष त्यांचे नेतृत्व स्वीकारणार का ? इथेच तर घोडे पेण खातंय ना ! नाही म्हणायला विरोधकांच्यात - राजकारणी आहेत जे भाजपेतर पक्षांचे नेतृत्व करू शकतात. परंतु ते सर्वमान्य नसणार. आणि निवडणुकांत सातत्याने भोपळे ना फोडण्याचे विक्रम करणाऱ्या पक्षाला आयते नेतृत्व अपेक्षित असणार. दरम्यान मोदी-शहांना हा पराभव थोडा क्लेशदायक असला तरीही मैदानात लढण्याची सवय आहे त्यांना. मुख्य म्हणजे काय-कुठे चुका झाल्या हे हेरून त्या सुधारायची इच्छा आणि पद्धत आहे.त्याचे कारण असे कि ते या अनुभवातून अनेकदा गेलेत आणि शिकत आलेत .उगाच नाही जगातला सर्वात मोठा पक्ष चालवत ते ! शिवाय विधानसभेच्या आणि लोकसभेच्या मतदानात फरक असतो. हा जसा दीदींच्या पथ्यावर पडला तास तो लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करणार. आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे - मोदी नाही तर कोण ? हा प्रश्न. आजही निवडणुका घेतल्या तरी भाजपा दुसऱ्या क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा दुप्पट ते अडीचपट जागा मिळवू शकतो. ती त्यांची ताकद आहे.आणि ती जिद्दीने आणि कष्टाने मिळवली आहे. उगाच चार ट्विट केल्याने ती नाहीशी होणार नाही. परंतु काही उतावीळ नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतात ...त्यांना कोण काय सांगणार ?

सुशांत गोसावी 

Saturday, February 13, 2021

फसलेली धर्मनिरपेक्षता -भाग १

           अठरा -वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. बऱ्याचशा राजकीय तज्ज्ञांना आठवणार पण नाही. ज्यांना आठवत असेल ते ही सोयीस्कररित्या डोळझाक करीत असतील. सोशल मेडियावरचे तथाकथित  "तज्ज्ञ " तर अस्थित्वातही नव्हते. सोशल मीडियाच नव्हती! म्हणजे अगदी नव्हती असे नाही. जे होते त्यातही तथाकथित तज्ज्ञ घाण करीतच होते ! परंतु आज इतकी प्रभावी नव्हती.  बरं गोधराकांड होण्याआधीची ही गोष्ट बरं का ! हे विशेष नमुद करतोय.  केंद्रात वाजपेयीजींचे सरकार होते. एक -दोन -तीन प्रयत्नांनंतर कुठे ते बहुमतातले सरकार स्थापन करू शकले होते. तेही स्थिर असे नव्हतेच. कधी समता कधी ममता आणि कधी जयललिता फणा वर काढीत. आणि मग प्रमोद महाजन त्या नागिणीला शांत करायला जात. परंतु सरकार काम करीत होते. कार्यक्षम होते किंवा नाही हा ज्याचा त्याचा दृष्टीकोण झाला. परंतु काम चालले होते. आधीच्या काँग्रेस आणि त्यानंतरच्या  खिचडी सरकारच्या ज्या काही चांगल्या योजना होत्या त्या सरकारने तशाच सुरु ठेवल्या होत्या. खासगीकरण आणि जागतिकीकरणाला आधीच्या सरकारांप्रमाणेच आणि राष्ट्रनीतीला अनुसरुन चालना देत होते. प्रसंगी संघ किंवा संलग्न संस्थांचा विरोध झुडकारून! त्या व्यतिरिक्तही सरकारने बऱ्याच चांगल्या योजना हाती घेतल्या होत्या. महत्वाच्या राष्ट्रीय मार्गांचे चौपदरीकरण वेगाने सुरु होते.सेवा आणि निर्मिती क्षेत्रातही बरीच प्रगती पहायला मिळत होती.  भारताने १९९८ मध्ये अणुचाचण्या केल्या आणि देशावर अनेक आर्थिक आणि इतर निर्बंध लादले गेले. परंतु त्यांनाही पुरून उरत भारताच्या प्रगतीचा जोर सुरूच होता. असे कुठलेही क्षेत्र नव्हते जिथे अदोगती होत होती.अर्थात कुठल्याही सरकारमध्ये असतात तसे गुणदोष या सरकारमध्येही होतेच.

या सगळ्यात विरोधक काय करीत होते?विरोधक म्हणजे फक्त विरोधी पक्ष नाही बरं का ? विरोधी पक्ष ही एक चांगली संकल्पना आहे. आणि ते संकल्पनेपुरतेच ठीक आहेत ! आम्ही विचारसरणी बद्दल बोलतोय. डावे किंवा आज काल फेक्युलर का काय म्हणतात तेच ते.  तर देशात कशी अशांतता पसरली आहे, धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे , फॅसिस्ट संघवाले आता देशावर आणीबाणी लादणार.पंतप्रधांना कसे नागपूरहून आदेश येतात याचे चविष्ट वर्णन .धार्मिक सहिष्णुता भंग होत चालली आहे याबद्दल रडारड . कुठले छोटेसे प्रकरण उकरून काढणे आणि अल्पसंख्याकांवर कसा अत्याचार होतोय या बद्दल काहुर माजविणे असले उद्योग चालू होते. जवळपास सर्वच्या सर्व मीडिया आणि विरोधी पक्ष याच उद्योगात जुंपली होती. रोजच्या रोज असल्याच बातम्या येत. डोके फिरून जायचे. बरं उजव्यांची तेंव्हा मीडिया उद्योगात एवढी पकड नव्हती . त्यामुळे यांना विरोध करणारे असे फार नव्हते. दिवंगत वर्षा भोसले होत्या (आशा भोसलेंची मुलगी). ती जाम फाडून खायची यांना. वृत्तपत्रांवर आणि मीडियावर लोकांचा त्याकाळी बऱ्यापैकी विश्वास होता. त्यामुळे असल्या बातम्यांमुळे  मन उद्विग्न होत . एका क्षणी तर असं वाटायला लागलं की नको त्या वाईट बातम्या. सरकार गेलं तरी बेहेत्तर ! आणि सरकार खरोखर गेलेच. ते त्यांच्या चुकीच्या प्रचारतंत्राने( इंडिया शायनिंग ) की धोरणांमुळे किंवा अनेक लोक विरोधकांच्या दुष्प्रचाराला कंटाळले होते म्हणून ते माहित नाही. पुढे गोध्राकांडानंतर सुद्धा यांनी हेच तंत्र अवलंबिले. मोदी चुकीचे कि बरोबर यात आम्ही पडतच नाही आहोत. परंतु स्वतंत्र भारतात कुठल्याही नेत्याचा माध्यमांद्वारे खटला चालला नसेल जेवढा मोदींचा चालला.कुठल्याही नेत्याला केंद्रीय सुरक्षा पथकांचा सासीमारा सोसावा लागला नसेल इतका त्यांच्या मागे लावण्यात आला. १० वर्षे काँग्रेसचे सरकार असून सुद्धा काहीही सिद्ध करू शकले नाहीत हे विशेष.

आज वीस वर्षांनंतर काय स्थिती आहे ? आपल्या सुदैवाने आणि काहींच्या दुर्दैवाने भारत आजही अखंड आहे- आणि राहणार. भारतात आजही अल्पसंख्याक गुण्यागोविंदाने नांदतायत. वीसवर्षांत त्यांची लोकसंख्या वाढलीच आहे ( असो-तो मुद्दा नाही). फॅसिस्ट राजवट अल्पसंख्याकांचा छळ करील वगैरे भ्रामक कल्पना सत्यात कधी उतरल्या नाहीत.ज्या वाजपेयींच्या नावाने गरळ ओकली ,ज्यांचे सरकार एका मताने पाडले त्यांच्यावर याच लोकांकडून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. वाजपयी कसे सर्वसमावेशक होते म्हणे. ज्या अडवाणींना 'हॉक' म्हणून हिणवलं, ते यांना सौम्य वाटायला लागले! ज्या मोदींना शिव्या शाप दिला ते एकदा नव्हे तर दोनदा निवडून आले. ते ही प्रचंड बहुमताने.पिढी दर पिढी भाजपाचे नेतृत्व अधिक कर्मठ ,अधिक "उजवे " होत चालले आहे. दोन तृतीयांश च्या जवळपास बहुमत मिळून सुद्धा जर विरोधक आणि फेक्युलर फॅसिस्ट म्हणून हिणवणार असतील तर आणखी काय होणार? मोदींच्या पहिल्या कार्यकाळात सुद्धा "अल्पसंख्याक खतरे मे है " ," संघ का अजेंडा है" वगैरे आरोळ्या सुरु झाल्याच होत्या. इकडचे तिकडचे चार गुन्हे उचलून कसा अल्पसंख्याकांवर अन्याय होतोय, धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे आणि त्याला केंद्र सरकार जवाबदार आहे हे दाखवण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले. अजूनही होतायत. पन्नास शंभर वर्षांपूर्वीचे काहीतरी संदर्भ काढायचे आणि फॅसिस्ट म्हणून हिणवायचे असे उद्योग अविरत सुरु आहेत . परंतु आता उजवी मीडिया पण "पॉवरफुल" झाली आहे. त्यामुळे मीडिया चांगलीच वॉर रंगते !जनसंघाचे नवीन रूप म्हणून १९८४ मध्ये भाजप अस्तित्वात आली आणि १९८५ ची सार्वत्रिक निवडणूक त्यांनी लढवली. जागा आणि . टक्के मते मिळविणाऱ्या या पक्षाचा प्रगतीचा आलेख वरच चाललाय. २००९ चा अपवाद सोडता त्यांच्या मतदान टक्केवारीत लक्षणीय अशी घट कधीच झालेली नाही. बरं ३५ वर्षांत भाजपा फक्त १३ वर्षे सत्तेत होता हे विशेष.

हे सगळे काय दर्शवते? तर जनतेचा आणि खास करून हिंदूंचा क्रमाक्रमाने वाढत चाललेला विश्वास. आणि तो का ? हिंदू असहिष्णू आहे म्हणून ? का कोण तो बावळट म्हणाला त्या प्रमाणे सडला आहे म्हणून ? तसे असते तर भारतात रक्ताच्या नद्या वाहिल्या असत्या! किमान-असे बोलण्यासाठी विरोधकच अस्तित्वात नसते ( - वर्षे पुरेसे असतात !) . त्याचे कारण एकच - सामान्य नागरिक टीव्ही वरची बाष्कळ चर्चा बघतो, फेसबुक, ट्विटर वरचा मोदी -भाजप -संघ विरुद्धचा काहूर बघतो आणि " हे खरे नाही.मला दिसतंय " म्हणत खदखदत राहतो. ती खदखद बाहेर निघती निवडणुकांवेळी. गम्मत म्हणजे चुकीच्या धोरणांमुळे किंवा निर्णयांमुळे क्वचित बॅकफूटवर जाऊ पाहणाऱ्या सरकारला असल्या बाष्कळ दुष्प्रचारामुळे संजीवनी मिळते ! मोदी असल्या संधीचा उपयोग करून घेण्यात माहीर आहेतच! काँग्रेस जी आज सेकुलर वगैरे असल्याचा कांगावा करत आहे , त्यांना हे लक्षातच येत नाही आहे कि १९९६ पर्यंत त्यांनी जी सत्ता उपभोगली त्याचे कारण लोक त्यांना प्रामुख्याने हिंदूंचा पक्ष गणित होते. पर्याय मिळताच लोक भाजपा कडे वळले ! भारतात हिंदू बहुसंख्य असल्यामुळे हिंदू जे ठरवतील तेच सरकार येणार हे तर उघड सत्य आहे. मग इतके ओपन सिक्रेट असतांना विरोधकांना योग्य रणनीती का आखता येत नाही ?त्याचे कारण सरळ आहे -रणनीती आखायला आपली समस्या काय आहे हे मुळात समजायला हवे ना ? संघावर आणि भाजपावर फॅसिस्ट वगैरे असल्याचे हल्ले करण्यात जुंपलेल्या विरोधकांना हे लक्षात येत नाही कि त्यांनी डागलेल्या १० गोळ्यांपैयी ६-७ या सामान्य हिंदूंचे हृदय छेदतात !! आणि परिणाम निवडणुकीत दिसतात ! थोडक्यात -त्यांना हिंदूंची मानसिकताच कळलेली नाही! आणि पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेचे  चष्मे लावून भारतीय समाजाकडे बघणार्यांना ती कधी कळणार पण नाही

हिंदूंच्या मानसिकतेविषयी पुढील भागात सविस्तर लिहिणार आहे

क्रमश:

सुशांत गोसावी

Saturday, January 16, 2021

तात्यापुराण भाग १ -उदयास्त

             तात्या गेले. म्हणजे गेल्यात जमा आहेत. अर्थात त्यांचा विघ्नसंतोषी स्वभाव पाहता शेवटच्या काही तासांतही ते काहीतरी (स्वतःसाठी) विध्वंसक करू शकतात .परंतु त्यांच्या वागण्यावरून किंवा देहबोलीवरून शक्यता कमी वाटते . तात्या जाणार हे विधान दोन महिन्यांपूर्वी पण करता आले असते. परंतु ते काहीतरी भानगड करणार याचा अंदाज जवळपास सगळ्यांनाच होता. आणि तसेच झाले. त्यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये जो राडा घातला त्यामुळे जो अभूतपूर्व ( म्हणजे सुमारे दोन शतकानंतर ) प्रसंग उद्भवला आणि अमेरिकेची जी नाचक्की झाली ती विसरायला बराच काळ जाईल. अमेरिकन जनता ,प्रशाससकीय व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा ही गोष्ट लवकर विसरणार नाहीत. आणि विसरू ही नये. अर्थात अमेरीकेत लोकशाहीची मुळे भक्कम आहेत.याआधीपण तो देश बिकट राजकीय प्रसंगातून अनेकदा गेला आहे. त्यामुळे असले प्रसंग निभावून नेण्याची मूलभूत क्षमता तिथल्या व्यवस्थेत आहे. असले चार तात्या आले तरी काही बिघडवू शकणार नाहीत. परंतु असले तात्या मुळात येऊच नयेत याची व्यवस्था किंवा उपाययोजना करता येईल का ? ते पहायला हवे.

दैव देते आणि कर्म नेते -याचे उत्तम उदाहरण म्हणजे तात्या. अर्थात राष्ट्रपतीपद हे काही त्यांना कोणी आंदण दिले नाही- कि आई ने सांगितले बस गादीवर म्हणून बसले. पेशाने व्यावसायिक असलेल्या, रंगेल जीवन जगणाऱ्या आणि रिऍलिटी शो मुळे (किमान अमेरिकेत ) प्रसिद्ध असलेल्या तात्यांनी त्यांच्या या गुणांचा ( असेट्स ) पुरेपूर फायदा करून घेतला. त्यांचे दुर्गुण (लायबलिटिस ) देशाला आणि जगाला नंतर कळले हा भाग वेगळा! अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स दोन्ही पक्षांचे आपापले खंदे समर्थक आहेत आणि उन्नीस -बीस च्या फरकाने दोन्ही पक्ष  निवडणुका जिंकत असतात. बऱ्याचदा आळी -पाळी ने. अर्थात काही राज्य ही रिपब्लिकन पक्षाचे स्थायी गढ मानले जातात तर काही डेमोक्रॅटिक पक्षाचे. सांगायचे असे कि जेंव्हा तात्या राष्ट्रपतीपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेद्वार झाले तेंव्हा त्यांना हा सगळा पाठिंबा वारसाहक्काने मिळाला. परंतु या बरोबरच तात्यांनी एक कल्पक गोष्ट केली.ती काय ? हे समजण्यासाठी आपल्याला काही दशके मागे जावे लागेल.

९० च्या दशकांपर्यंत अमेरिका ही एक आर्थिक,राजकीय, सैनिकी आणि सामरिक महासत्ता होती. किंबहुना ५०-९० ही दशके अमेरिकेचा सुवर्णकाळ मनाला जातो.डोन्ट गेट मीरॉंग - आजही अमेरिका एक महासत्ताच आहे आणि नजीकच्या काळात तरी राहील असे वाटतंय. परंतु फरक असा कि नव्वदी पर्यंत या सुबत्तेचा थेट फायदा तेथील सामान्य जनतेला होत. दोन्ही कोस्ट ( म्हणजे न्यू यॉर्क , बोस्टन  किंवा कॅलिफोर्निया ,सिएटल ) सोडले तर एक बराच मोठा मध्यमवर्ग अमेरिकेतील इतर राज्यांत एक समृद्धीचे नसले तरी संपन्न जीवन जगत होता. मुलांना मोफत शिक्षण , कॉलेजात नाही गेले तरी पोट भरेल अशा  नोकऱ्या  किंवा उत्पन्नाचे स्रोत पुरेसे उपलब्ध होते. कारखाने होते,शेतमालाला चांगला भाव होता. एकंदरीत मज्जानु लाईफ होती. परंतु जागतिकरणाच्या फरफट्यात हा वर्ग बाधित होऊ लागला. कारखाने देशाबाहेर स्थलांतरित होऊ लागले. शेतीच्या धंद्यात उद्योगपती उतरले आणि छोट्या-मध्यम शेतकऱ्यांची दैना झाली. त्यात परदेशातून अधिकृत किंवा अनधिकृतरित्या आलेल्या कामगारांमुळे नोकऱ्या मिळणे अवघड झाले. आपले आई -वडील किंवा आजी आजोबा जे जीवन जगत होते ते ही नव्वदी नंतरच्या पिढीला जगणे अवघड झाले. देशातील मूठभर लोक अति श्रीमंत होत गेले आणि जागतिकारणामुळे प्रभावित झालेल्यांची बिकट अवस्था झाली. आणि हा असंतोष अनेक वर्षे त्यांच्या मनात खदखदत होता. त्यात्यांनी हे अचूक हेरले आणि आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविला. मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA) या घोशवाक्याने अमेरिका ढवळून निघाली. नोकऱ्यांसाठी झगडावे लागणाऱ्या शहरी भागातील सुशिक्षितांची आणि परदेशीयांमुळे 'अमेरिकत्व' नष्ट होतंय असे मानणाऱ्या काहींची साथ मिळाली आणि तात्या निवडून आले ! हा एक्का हुकुमी होता !

असे असले तरी आम्ही -दैव देतं असे का म्हणतोय ? तर असल्या किचकट निवडणुकीत एकच मुद्दा तुम्हाला जिंकवू शकत नाही. वेळ ( टायमिंग ) महत्वाची असते. विरोधक कोण, त्यांचा जनमतावरील प्रभाव किती , मागून राजकारण करून तुम्हाला खाली खेचणारे किती?, ऐनवेळी बाहेर येणारे स्कँडल अशा इतर अनेक गोष्टी वारे फिरवू शकतात. तर तात्यांच्या निवडून येण्यात जितका वाटा MAGA चा आहे त्याहून अधिक या इतर गोष्टींचा आहे. ओबामांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळानंतर काही प्रमाणात असंतोष होताच. त्यात हिलरी क्लिंटन या अनेकदृष्टीने वादग्रस्त ठरत होत्या.रिपब्लिकन पक्षाकडे दुसरा कोणी खंदा उमेदवार पण नव्हता ! या सगळ्यात तात्यांची लॉटरी लागली!

निवडून येताच तात्यांनी राडा घालायला सुरुवात केली. त्यांचे वादग्रस्त निर्णय,विचित्र विधाने आणि येता जाता मंत्र्यांना बडतर्फ करणे यामुळे जनता त्रस्त झाली  आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हाहाकार माजला. परंतु या सगळ्यात त्यांच्या काही वादग्रस्त निर्णयांमुळे त्यांनी एका विशिष्ट वर्गवारील आपला प्रभाव टिकवून ठेवला. मी सोडून सगळे -खासकरून डेमोक्रॅट्स हा देश विकायला निघाले आहेत हा त्यांचा युक्तिवाद असंतुष्ट वर्गाला भावाला आणि ते तात्यांचे डाय हार्ड फॅन्स बनून राहिले! आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुतांश देश तात्यांमुळे त्रस्त असले तरी काही मोजक्यांना त्यांचा फायदा झाला. किंवा करून घेता आला असे म्हणू ! भारत आणि मोदी - हे त्यातील एक. या विषयावर सविस्तर लिहिणारच आहे पुढील भागात. त्रयस्थ दृष्टीने पहायचे झाले तर तात्यांचा कार्यकाळ हा प्रामुख्याने स्वकेंद्रित कृत्यांनी गाजला.  MAGA ची जागा  आय मी मयसेल्फ ने केंव्हा घेतली कळलंच नाही बरेच जणांना. कळलं तेंव्हा बराच उशीर झाला होता. परंतु पुन्हा ऊन पुन्हा पाऊस -पुन्हा पालवी फुटते तसे पुन्हा निवडणुका आल्या आणि यावेळी अमेरिकन जनतेने ठामपणे निर्णय दिला JAGA ( जा घरी). परंतु स्वतःच्या विश्वात रममाण असलेले तात्या ऐकतील तर ते तात्या कसले? अनपेक्षितरित्या सत्तेवर आलेल्या तात्यांना तेवढ्याच मानहानीकारकरित्या पायउतार व्हावे लागणार. आणि याला सर्वस्वी तेच जवाबदार असतील. कर्म ....दुसरे काय ?