बहात्तराव्या वर्षी बहुतेक माणसं निवृत्त होऊन शांत आयुष्य जगत असतात. रोजचा व्यायाम, गोळ्या वेळेवर घेणे, आहाराची पथ्य पाळणे, नातवंडांना खेळविणे , देव देव, नामजप - हा दिनक्रम. कधी मित्रांना कट्ट्यावर भेटणे, बायकोशी( किंवा नवऱ्याशी) तुरळक कारणावरून हुज्जत घालणे आणि अगदी तब्बेतीने आणि खिशाने साथ दिलीच तर वर्षातून एखादी ट्रीप करून येणे असे हे साठी नंतरचे निवृत्त आयुष्य. अगदी व्यापारी किंवा व्यवसायिक सुद्धा सत्तरी आली की व्यवसाय इतरांच्या हवले करून निवृत्त होतात. अर्थात हाडाचे राजकारणी याला अपवाद असतात. ते ऐंशीव्या वर्षी पण भर पावसात सभा घेतात. आणि काही तर स्वेच्छेने राष्ट्रप्रमुख पदासाठी लढतात. परंतु ते ठरले हाडाचे राजकारणी आणि त्यांच्यातही अपवाद असे. बहुतांश राजकारणी सुद्धा सत्तरीत आमदारकी, खासदारकी आणि जमलेच तर एखादे पद घेऊन शांत बसतात. कल आपल्या मुलांना सेटल करण्याकडे असतो. अशात एक दिवशी निरोप येतो - तातडीने बोलावले आहे. गेल्यावर कारण कळते. तुमची जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी नेमणूक करायची आहे! एक क्षण स्वतःला त्या परिस्थितीत ठेवून बघा. कसे वाटेल? पायाखालची जमीन सरकणार हे नक्की ! बरं वय झाला एक पैलू. पंतप्रधानपद ते काय? काटेरी मुकूटच तो ! त्यात रत्ने कमी आणि काटेच जास्त ! दोनशे सत्तर बहुमतासाठी हवे असताना तुमच्याकडे खासदार किती? अंमळ १४५. बाकी सतराशे साठ पक्षांना सोबत घेऊन मोट बांधायची. ते केंव्हा खाली खेचतील काही भरोसा नाही. आणि खुद्द तुमच्या पक्षातील अनेक जण डावलल्यामुळे नाराज असणार. त्यांनाही सोबत घेऊनच चालायचे. बरं हे सगळे कशासाठी ? आयुष्यात अत्युच्च अशी जी पदे भूषावू शकतो ती आधीच भूषावून झाली होती. काही साध्य करायचे असे शिल्लक राहिले नव्हते. देशाच्या इतिहासात नाव दहा बारा वर्षांपूर्वीच कोरले गेले होते. मग ही ऑफर का घ्यायची आणि पायावर धोंडा मारून घ्यायचा?
दुसरा कोणी येरागबाळा असता तर त्याने पंतप्रधानपद सोडा साधे सोसायटीचे चेअरमन पदही घेतले नसते. परंतु ते ठरले मनमोहन सिंह. नाही म्हणणे त्यांच्या स्वभावातच नसावे कदाचित. किंवा आपण नाही म्हणालो तर पुढील ब्रह्मांड त्यांना आधीच दिसले असावे. ती सत्तेसाठीची चढाओढ, त्यातून उद्भवणारी अस्थरिता त्यांनी आधीच हेरली असणार. तेवढे ते चाणाक्ष निश्चित होते. किंबहुना त्या काळातील सर्वात हुशार राज्यकर्त्यांपैकी एक होते. परंतु आपली बुद्धिमत्ता आणि अनुभव कुठे वापरावा याचे त्यांना भान होते. तसे हे काटेरी मुकुट धारण करण्यापूर्वी त्यांना नाही म्हणायला अनुभव गाठीशी होताच. नरसिंह रावांनी असच बोलावून अर्थमंत्रिपदी नेमणूक केली होती. आणि मनमोहन सिंघांनी जे केले ते निदान भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात तरी अद्वितीय होते. कोणी म्हणेल रावांचा वरदहस्त होता. बरोबर आहे. परंतु एक लक्षात घ्या वरदहस्त कायम यशाच्या पाठीशी असतो. एक घोर चूक आणि मनमोहन सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता. नाव केंव्हाच इतिहासजमा झाले असते. आर्थिक सुधारणांचा बोऱ्या वाजला असता हे वेगळे सांगायला नको. परंतु सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची लकब आणि आपल्या धोरणांवर ठाम राहणे या गुणांवर सींघांनी ती पाच वर्षे यशवीरीत्या निभावून नेली. विशेष म्हणजे त्यांच्या धोरणांवर आग ओकणाऱ्या एकही पक्षाने पुढे त्यांची धोरणे माघारी घेतली नाहीत. हेच त्यांचे यश.
पंतप्रधानपद अपेक्षेप्रमाणे सोपे नव्हतेच. आघाडीतील पक्षांना सांभाळणे, हाई कमांडची मर्जी राखणे. निर्णय स्वतः घेणे परंतु पक्षाधीपतींना डावलून काही करत नाही असे वातावरण निर्मिती करणे. काहीवेळा आपला अहंकार बाजूला ठेवून त्यांच्या सूचना पाळणे. तिकडे अनपेक्षित पराजयामुळे विरोधी पक्ष बिथरला होता आणि सगळा राग सरकारवर काढण्यास अतूर् होता. आज काल डीप स्टेट चे खुळ चालले आहे. डीप स्टेट काय आज जन्माला आले का? पूर्ण बहुमत नसलेल्या पंतप्रधानांवर किती प्रेशर असणार? तणाव साधासुधा नसणार. अशात मनमोहन सिंहांनी भारताचे पंतप्रधानपद भूषविले. ते पण एकादा नव्हे तर दोनदा. तब्बल 10 वर्षे! त्याकाळातील परिस्थितीचा विचार करता हीच सर्वात मोठी उपलब्धि म्हणावी. परंतु एवढे होऊनही ते श्रेय घेण्यासाठी कधी पुढे सरावले नाहीत. अहंभाव त्यांच्यात मुळात नव्हताच. आणि तेच त्यांच्या यशाचे गुपित होते. त्यांच्या नावावर इतरही काही पराक्रम जोडलेले आहेत. अणुकरार असो की आधार कार्ड, मनरेगा योजना असो की बँकिंग सेवांचा विस्तार असो. राजकारणी सहसहा आपली किर्ती टिकवण्यासाठी सत्ता पणाला लावतो. मनमोहन सिंहांनी अणूकरारासाठी लावली. वाजपेयी सरकारने जे धोरण अंमलात आणले ते बहुतांशरीत्या त्यांनी सुरू ठेवले.
अर्थात त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर टीकाही खूप झाली. काही ठिकाणी ती योग्यही होती. मुंबईवरील हल्ला असो किंवा भ्रष्टाचार , सिंह कमकुवत दिसले. परंतु त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत कोणताही राजनेता वेगळे निर्णय घेऊ शकला नसता कदाचित.अल्पमतातील सरकार आणि 350 बहुमत असलेले सरकार यांची तुलना होऊच शकत नाही. आज पंधरा वीस जागा कमी पडत आहेत तर सध्याचे सरकार सगळी बिले संसदीय समितीकडे धाडते आहे. जेंव्हा सहयोगी पक्षांचे बलाबल शंभरित असेल तेंव्हा काय परिस्थिती असणार?. हां राजीनामा देणे हा पर्याय होता. ते करणे सोपे होते. तसे करून मनमोहनसिंह हिरो झालेही असते. परंतु देशाचे काय हो ? तो विचार कोणी करतो का? सिंह गेल्यावर सत्ता कोणाकडे असती? त्यांना किती हिणवले गेले , अपमानित केले गेले याची गणानाच नाही. परंतु त्यांनी स्वतः अपमानित होऊन देशाचा विचार केला. टिकून राहणे सोपे नसते. हिरो बनणे सोपे असते. विचार करून बघा - तुम्हाला काय जड जाईल ते! आणि बाय द वे, त्यांच्यकळतील जे कथित भ्रष्टाचार झाले त्यातील आजतायात एकाचाही निकाल लागलेला नाही का! जस्ट एफ वाय आय 😊! लोकपाल अजून यायचा आहे. वाट बघून बघून अण्णाही दमले ! मनमोहन सिंह यांच्या आयुष्याचे किंवा कार्यकर्दी चे अवलोकन करणे हा इथे हेतू नाही. तसे अनेकांनी केले आहे. त्यांची बायोग्राफी अनेकांनी लिहिली आहे. लिहिली जाईल. चित्रपट पण निघाला आहे. दुर्दैवाने बहुतांश विवरणे ही नकारात्मक चित्र प्रस्तुत करतात. गोष्टींना परिस्थितीजन्य परिपेक्षातून दाखविणे हा आमचा हेतू होय.
आज श्री मनमोहन सिंह काळाच्या पडद्याआड गेले. देशाच्या या महान सुपुत्राला मानाचा मुजरा. गतात्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏. आमच्या आणि पुढील पिढ्यांसाठी - विशेषकरून सत्तरीत आणि नंतर जन्मलेल्या पिढीला सिंह देवदूतच होते. आज जे आहोत त्याचे सर्व श्रेय त्यांनाच जाते. त्यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू. शतशः नमन डॉक्टर साहेब 🙏🙏. आज स्वर्गात आनंदोत्सव साजरा होत असणार हे नक्की 😊. आफ्टर ऑल इट्स इंद्रास प्लेझर टू हॅव यू देअर् !
त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शेवटच्या पत्रकार परिषदेतील एक वाक्य -
… I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament… Given the political compulsions, I have done the best I could do.” ”…I have done as well as I could do according to the circumstances… It is for history to judge what I have done or what I have not done.