Saturday, June 22, 2024

आकलन - निवडणुकांचे

         भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल लागल्यापासून राजकीय पक्ष, तथाकथित तज्ञ आणि माध्यामांवरील प्रतिक्रिया ऐकणे, वाचणे हा एक गमतीशीर आणि विस्मयकारक अनुभव होता. किंबहुना अजूनही आहे. निकाल लागताच विरोधकांमध्ये आणि त्यांच्याशी संलग्न माध्यमे आणि तज्ज्ञांच्या गोटात अभूतपूर्व विजयाचे आनंदी वारे वाहत होते.तर भाजप गोटात शांतता होती. म्हणजे मोदींनी जाहीररीत्या विजय घोषित केला तरी एकंदरीत उत्साह जरा संयमी होता. कसं आहे ना - विजय आणि पराभव हे तुलनात्मक असतात. नव्वद टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने ब्यांशी टक्के मिळवले तर तो पराभव असतो. तर जेमतेम काठावर उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याने पन्नास पंचावन्न टक्के मिळवले तरी तो उतुंग विजय असतो. शेवटी नियमात बसतो त्यालाच पुढील प्रक्रियेत प्रवेश मिळतो. सापेक्षवादाला खऱ्या आयुष्यात फारसा अर्थ नसतो. त्यामुळे कोणी काहीही म्हणो, तथाकथित अडसरांना बगल देत मोदींनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पुढे सगळे सुरळीत असेलच असेही नाही. परंतु तात्विक विचार करता, पुढील घटनाक्रमाची भविष्यवाणी करणे तसेही अवघड आणि निरर्थक आहे. 

            नाही म्हणायला रा लो आ सरकारला घटनात्मक कायदे संमत करून घेणे अवघड जाईल असा सार्वत्रिक समज आहे. परंतु ते अशक्य आहे असे ही नाही. विरोधी गटामध्ये एकजूट आहे असेही म्हणता येणार नाही. कलम 370 संसदेत संमत होऊच शकत नाही . झाले तरीही ते कायद्याला धरून नसेल हा बऱ्याच जणांचा समज होता. तो खोटा ठरला. हां - लोकसभेत विरोधकांच्या आवाजाला बऱ्यापैकी बळ मिळणार हे खरे आहे. परंतु सरकारने  संसदेत आणलेला प्रत्येक कायदा, प्रस्ताव हा संमत होण्यासाठी नसतोच. कधी कधी विरोधकांना लोकांसमोर उघडे करणे हा ही उद्देश असतो. आणि भाजपा आघडाचे सरकार ते करणार यात शंका नाही. उलट आता त्यांची जवाबदारी कमी झाली आहे असे म्हणता येईल. काहीही झाले तरी विरोधकांना आणि बहुमत न दिल्याबद्दल लोकांना दोष देता येऊ शकतो ! 

             गेल्या तीनेक आठवड्यात भाजपचा पराभव का झाला - खास करून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत अशी परिस्थिती का आली या संदर्भात अनेक तज्ज्ञांनी मत नोंदवले आहे. गंमत म्हणजे यापैकी कोणीही तथाकथित तज्ञ निकालाचा अचूक अंदाज व्यक्त करू शकला नव्हता. किंबहुना चार जून आधी यापैकी नव्वद टक्के लोक हे भाजपला तीनशे पन्नास जागा देऊन मोकळे झाले होते. भाजपने कमी जागा का जिंकल्या याचे विश्लेषण त्यांनी करावेच आणि ते करतीलही. खासकरून 2004 आणि 2024 या दोन्ही निवडणुकांमध्ये आपण जनतेचा रोख का ओळखू शकलो नाही याचे त्या पक्षाने विशेषकरून  विश्लेषण करणे गरजेचे आहे. परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेकडोंच्या संख्येत असलेले चॅनल्स, समाज माध्यमे आणि त्याही पेक्षा तथाकथित तज्ञ हे का हेरू शकले नाहीत? असा आहे. भाजपा समर्थक सोडाच परंतु तथाकथित तटस्थ विश्लेषक , चॅनल्स ही भाजप स्पष्ट  बहुमत मिळवेल या मताचे होते. भारतासारख्या विशाल आणि बहुभाषिक, विविधतेने नटलेल्या देशात अंदाज वर्तवणे तसे अवघडच असते. परंतु यात तथाकथित ' आर्म चेअर ' तज्ज्ञांच्या ए सी खोलीत बसून वरतवलेल्या अंदाजांचा फोलपणाही प्रकर्शून जाणवतो. राजकीय पक्ष सोडाच , परंतु माध्यमांचा, सामाजिक तज्ञांचाही समाजाशी जोडणारा धागा कधीच तुटलेला आहे हे ठळक पणे दिसून येते. या निवडणुकांच्या निकालाचा सर्वात मोठा निष्कर्ष हाच आहे. 

           आमचे बोलायचे झाले तर - निवडणुकांच्या आधी आणि पश्चात एखाद अपवाद सोडला तर आम्ही भाष्य करायचे टाळले. कारण अस्थिर वातावरणात अंदाज वर्तवणे अवघड असते..आणि  उगाच खरे खोटे काहीही अंदाज वर्तवणे हे आमच्या पिंडात बसत नाही. नाही म्हणायला भाजप 230 ते 260 जागा जिंकेल असा अंदाज आम्ही मे महिन्याच्या मध्ये एका खासगी व्हॉट्सॲप ग्रुप द्वारे वर्तवला होता. त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत.  तो बरोब्बर ठरला यात आम्ही आनंद मानतो. याचा अर्थ आमचा जनमानसाशी कॉन्टॅक्ट होता का ? तर अजिबात नाही. उगाच खोटे कशाला बोलायचे? आपल्याला थोडीच कोणी पैसे देणार आहे 😊. हजारो मैल लांब बसून जनतेशी संवाद साधणे  अवघडच आहे. पण हो - जे वाचतो ऐकतो, बघतो आणि आकलन करतो त्याच्याशी आम्ही प्रामाणिक होतो एवढेच. फक्त तेवढ्याने एवढी अचूकता मिळवता येत असेल तर जनतेचे ऐकले तर काय होईल याचा विचार करा! आणि तुम्ही वाचत, ऐकत , बघत असलेले तज्ञ हे का हेरु शकले नाहीत याचा ही 😊

जय श्री राम ! 

सुशांत गोसावी

No comments:

Post a Comment