Saturday, September 7, 2019

पड्या -३


              "ब्रॉकोली आवडत नाही का रे?”- पड्याला काट्याने ब्रॉकोली बाजूला सारताना बघत न रहावुन मी विचारले.एव्हाना मी माझी डिश संपवून बसलो होतो. आपले जेवण झाल्यावर दुसऱ्याचे संपण्याची वाट पाहणे जाम जीवावर येते माझ्या. आणि त्यात समोरचा असा ताटातल्या जिन्नसांशी खेळत बसला तर राग येतोच येतो. परंतु समोर 'पड्या' होता. यांच्यासमोर रंगविणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. ठरल्या प्रमाणे पड्या आणि मी लंचला भेटलो होतो. जवळ आहे,पार्किंग मुबलक आहे म्हणून आम्ही एका मेक्सिकन रेस्टॉरंटची निवड केली. शिवाय पड्याला मी बोललो नाही पण दोन वाजताची मिटिंग होती आणि तिला उपस्थित रहाणेहेतू मी जवळच्या रेस्टॉरंटचा सल्ला दिला होता. पड्याला भेटण्यास मी कालपासून उत्सुक होतोच.तो सध्या काय करतो हा प्रश्न माझ्यासाठी कुठल्याही "ती सध्या काय करते" पेक्षा गहन झाला होता. कॉलेज नंतर या कलंदराचे पुढे आयुष्यात काय झाले हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती.बघता बघता जेवण झाले,गप्पा झाल्या आणि पड्याचा ब्रोकोलखेळ बघत बसलो होतो. शेवटी एकदाचे त्याने त्या बाजूला सारलेल्या ब्रॉकोलीच्या तुकड्यांवर चीझक्रीम ओतले आणि एक एक करून तोंडात टाकले. असा बेत होता तर ! पड्याने आणि मी एकच डिश मागवली होती. आणि संपवली होती. खाण्याच्या पद्धतीत मात्र फरक होता. त्याने वेळ घेतला परंतु आस्वाद घेत मनासारखा जेवला आणि मी चार चौघांसारखे पोटात ढकलले. किंबहुना जे जसे खातोय त्याला आस्वाद घेणे असे समजू लागलो होतो.अर्थात या नादात माझी दोन वाजताची मीटिंग बुडाली. बिल देऊन बाहेर पडलो .पड्या दोन दिवसांनी भारतात जाणार होता. त्याला सदिच्छा दिल्या आणि मी आपल्या डेस्क पाशी जाण्यास वळलो . परत कधी भेट होणार माहित नव्हते. त्या एका क्षणाला मला गहिवरून आले आणि मी पड्याच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडू लागलो. सीवन यांना विक्रम गेल्याचे जितके दुःख होत असेल तितकेच मला पड्या पुन्हा भेटणार नाही याचे होत होते. वास्तविक गेले वीस एक वर्ष माझा आणि त्याचा काहीएक संबंध नव्हता. एवढेच काय,मला क्वचितच त्याची आठवण येत.तरीही माझे अश्रू अनावर झाले होते. बरं महाविद्यालयातील जुन्या आठवणींवरून 'सेंटी' झालोय असे म्हणाल तर इतर बरेच मित्र गेले अनेक वर्ष भेटत आले होते. 'पुरानी जीन्स' म्हणत आम्ही त्या आठवणींना उजाळा देत, त्या क्षणापुरते नॉस्टॅल्जीक होत आणि पुन्हा आपआपल्या आयुष्यात रमून जात. आज मात्र काहीतरी वेगळेच घडत होते.
                पड्याची अगदी संक्षिप्त कहाणी म्हणजे -बहुतांच्या अपेक्षेप्रमाणे त्याला काही कॅम्पस जॉब मिळाला नव्हता. बरं याच्यासारखे आणखी बरेच होते. पण त्यांनी निकाल लागताच मुंबई/पुणे गाठले. काहींनी जमेल तिकडे आपापले 'रेझ्युमे' धाडले. पड्याने पहिले सहा महिने तर शिक्षण संपल्यानंतरचा विश्राम करण्यात घालविले .दरम्यान याच्या बाबांनी पन्नास एक मित्रांना नोकरीसाठी गळ घातली होती.काहीही उपयोग झाला नाही. काम चांगले नाही म्हणून चक्क जातच नसे मुलाखतीला. शेवटी घरी बसून कंटाळला तर 'कुलकर्णी असोसिएट्स' नावाची सांगलीतील अज्ञात कंपनी गाठली. तिथे नेटवर्क इंजिनिअर म्हणून महिना ५०० रुपयावर रुजू झाला. काही दिवसात त्याला लक्षात आले कि संगणकांवर फडके मारणे,विंडो इन्स्टॉल करणे आणि लॅन केबल दुरुस्त करणे या व्यतिरिक्त त्याला दुसरे काहीही काम नव्हते. कंटाळून ऍपटेक मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला. तिथे कोणीतरी सी –डॅक च्या कोर्से ची माहिती दिली आणि साहेबांची तयारी सुरु झाली. सी -डॅक ची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि बेंगळुरू येथे कोर्सेसाठी रुजू झाला. कोर्सदरम्यान शीतलशी खास मैत्री झाली. शीतल त्याच्याच वर्गातील एक अतिशय अभ्यासू,सरळ आणि 'बिलो रडार' मुलगी. आपले लेक्चर ,प्रॅक्टिकल ,अभ्यास ,असाइनमेंट या पलीकडे ती काहीही पहात नसत.गोलमाल(जुना) मधील राम प्रसाद शर्माचे फिमेल व्हर्जन म्हणा. पड्या दिवसातून जेवढा वेळ कॅन्टीनला घालवीत तितका कदाचित शीतल आठवड्यातपण घालवत नसेल. फायनल इयरला एक दोन वेळा मी दोघांना बोलताना पाहिले होते. परंतु काही वेगळे वाटले नाही. आणि तेंव्हा नसेलही कदाचित. पुढे बेंगळुरू ला दोघांची गट्टी जमली आणि लग्न करायचे ठरले. परीक्षित राजे लगेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. शीतलला हा कसा आवडला हे मोठे कोडे होते. पण काय ना - दिल आया गधे पे तो  (कुठल्याही हिरोचे नाव घाला -तसेही आपल्याला कोणीच आवडत नाही ) क्या चीझ है ? दरम्यान शीतलला पटणी मध्ये जॉब मिळाला होता. तीच्या बाबांनी मुलाला नोकरी पाहिजे अशी अट घातली ( शीतल आणि पड्याच्या  बाबांचा तो डाव होता). दोन आठवड्यात पुण्यातील एका कंपनीत नेटवर्क इंजिनिअर म्हणून रुजू पठ्ठ्या ! अर्थात ती पण नोकरी लग्न झाल्यावर काही महिन्यात गेली. पुढे अशाच नोकऱ्या मिळत गेल्या आणि पड्या सोडत गेला. किंवा असं म्हणा -पड्या नोकऱ्या सोडत गेला आणि तरीही त्याला मिळत गेल्या. दोन पान भर यादी होती त्याने काम केलेल्या कंपन्यांची. मला दाखवली तर मी हबकलोच. पुण्यातील एकही संगणकक्षेत्रातील छोटी अथवा मोठी कंपनी याने सोडली नव्हती धरायची -आणि सोडायची. आय टी क्षेत्र त्याकाळी 'बुमिंग' होते .त्यामुळे नोकऱ्या मिळत. शिवाय पड्या हुशार होताच. परंतु मनमौजी कारभार. बऱ्याचशा यानेच सोडल्या. काही ठिकाणी डच्चू मिळाला. दरम्यान शीतल संसाराचे एक टोक धरून होती . पटणी , पुढे कॅप जेमिनी पुढे अशीच एक मोठी आय टी कंपनी अशी तिची प्रगती सुरु होती. या सगळ्यात 'सुजय' चा पण जन्म झाला होता. सहा वर्षांपूर्वी शीतलला अमेरिकेत संधी मिळाली आणि सगळे इकडे स्थायिक झाले. पड्या डिपेंडेंट व्हिसा घेऊन नोकरी करू लागला. इथे पण त्याने तीन एक कंपन्या बदलल्या होत्या. शीतल मात्र फिनिक्स ला स्थायिक झाली आणि पड्या नोकरी मिळेल तिथे हिंडायचा. या सर्व काळात -काही दिवस अपवाद सोडले तर पड्या घरी बसून खातोय असे मात्र झाले नाही. तेवढा सुज्ञ तो निश्चित होता. दोन तीन दिवसांपूर्वीच आमच्या इथे रुजू झाला होता. इतक्यात बाबा आजारी असल्याची बातमी कळली आणि भारताची वारी करणे भाग पडले.
                त्या संध्याकाळी हिला पड्या पुराण ऐकविले. "धड नोकरी करता येत नाही. बायको मुलाचा सांभाळ करता येत नाही. तरी बरं ती बायको नोकरी आणि संसार सांभाळून आहे. त्यात तूला रडण्यासारखे काय झाले? " असा सरळ साधा निष्कर्ष काढून हि मोकळी झाली. मी पड्याचे एवढे कौतुक का करतोय हेच तिला कळत नव्हते. चूक काहीच नव्हते. दहा पैकी नऊ जणांनी असाच निष्कर्ष काढला असता. परंतु असा निष्कर्ष काढणाऱ्यांनी त्या प्रवासाचे शेवट -'फलित' पाहून आपला निष्कर्ष काढला होता. तो प्रवास कसा होता याचे कोणाला काहीच नव्हते. आज मला भेटलेला पड्या अगदी वीस वर्षांपूर्वीची प्रतिकृती होता. वयाने आणि काळाने जे काही बदल केले तेवढेच. तसाच बिंदास -बेफिकीर. आयुष्याच्या बोज्याने दबलेला नव्हता अगर उगाच जवाबदारीचा बागुलबुवा नव्हता. स्वछंद पक्षी -वीस वर्षांपूर्वी होता तसाच. ना कालची भीती -ना उद्या ची काळजी. वास्तविक आयुष्यात तो रोल मॉडेल निश्चित नसणार कारण प्रस्थापित जगात तो यशस्वी 'दिसणार' नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याचदा आपण नदीचा उलटा प्रवाह पोहून जात होतो तर पड्या मिळेल त्या नदीच्या प्रवाहाप्रमणे अलगद पुढे जात होता. त्याला 'डेस्टिनेशन' नव्हतेच मुळात. त्यामुळे जे काय ते प्रवासच  होते त्यांच्यादृष्टीने. आपण सगळेच मनाप्रमाणे वागून आनंदी राहण्याच्या वल्गना करीत आयुष्य घालवितो. संपूर्ण आयुष्य 'पड्या' च राहण्याची भाषा बोलतो  परंतु कार्यकर्तव्यभावमुळे म्हणा किंवा इतर बोज्यांमुळे तसे कधीच रहात नाही. पड्या मात्र जागचा हालला नव्हता. हिच काय ती त्याची 'चूक'
समाप्त


No comments:

Post a Comment