Sunday, April 12, 2020

नशीब

         तेरे नसीब में मै हुं के नहीं ,मेरे नशीब मे तू हय के नाही - हे गाणे ऐकतांना मला नेहेमी खुळेपणा वाटायचा. म्हणजे ,जे अनपेक्षित होतं ते तर नशिबाने दिले असे म्हणतात ना ? उद्धवजींना विचारा हवे तर. आणि खोटं वाटत असेल तर फडणवीसांना ! असो -कोणाचं नशीब कुठल्या परिस्थिती कसे उजळेल काही सांगता येत नाही राव. आता हेच बघा ना- कुठलं काय ते हैड्रोक्लोरोपीन -आज पर्यंत दोन चार डॉक्टर आणि फार्मसी कंपनी वाले सोडले तर कोणाला माहितही नव्हते ! माहित असायचे काही कारणच नाही म्हणा. सामान्यांना सोडा ,एम आर लोकांना तरी त्या मलेरियाच्या गोळ्यांत काय रसायन आहे हे माहित असेल कि नाही शंका आहे. कोणी तरी (अर्थातच पाश्चात्य देशात - आपल्याकडे लावला असता तर त्याला येड्यात काढले असते ना !) हा शोध लावला कि ते औषध कोरोना वर प्रभावी आहे आणि हैड्रोक्लोरोपीन ला  इंडिया -बी टीम च्या ट्वेल्व्हथ मॅन पदावरून थेट इंडियन टीम च्या ओपनिंग वर आणून ठेवले ! कारण का ? तर जगातल्या एकूण उत्पादनापैकी ७० टक्के भारतात होते. आता मुळात हे औषध वापरले जाते मलेरिया च्या उपचारासाठी. याचा अर्थ आपल्याकडे मलेरियाचे इतके रुग्ण असतात. ही अर्थातच देशासाठी भाषणावह बाब नाही. परंतु जसे गणपती विसर्जनावेळी नदीकाठी ,काडेपेटी सापडत नसतांना एखादा बिडी सिगारेट ओढणारा  खिशातून काढतो आणि आपला ( तत्कालीन का होईना) भाव वाढवतो तसे काहीसे झाले आहे. हैड्रोक्लोरोपीन ची मागणी वाढल्यामुळे औषध कंपन्यांचे शेअर भाव वधारणारच . सोबतच मोदींचे पण वधारले आणि देशाचा मान वाढला असे म्हणतात. पुढे कोरोना चे सावट संपल्यावर हेच आपले 'मित्र राष्ट्र'', मैत्री  विसरून सुग्रीवासारखे चैन विलासात रमून जाऊ नयेत म्हणजे मिळवले
सुग्रीवावरून आठवले - खऱ्या अर्थाने नशिबाचा कायापालट झाला आहे तो दूरदर्शनचा. कुठे कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या जुन्या मालिकांच्या सीड्या लावायला सुरुवात केली आणि इतर सर्व वाहिन्यांना ( आणि  मालिकांतील वहिन्यांना पण ) धुवून टाकले. हे म्हणजे पूर्वी  'व्ही एस एन एल ' , ' एन जी सी'  किंवा 'टी सी एस' चे लिस्टिंग झाले कि ते बाकीच्या सगळ्यांना धूळ चारत तशी गत झाली. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे जिओ. परंतु सध्या टाटांचा उदो उदो होतोय सोशल मीडिया वर म्हणून म्हंटलं 'टी सी एस'  चे नाव घेऊ. इतके दिवस  निन्जा हातोडी आणि राधिका मसालेवाले यांच्या तावडीत असलेला तो दूरदर्शन संच पण मोकळा श्वास घेत असेल सध्या. आतापर्यंत आजी आजोबा आणि मुलं हीच त्या टीव्ही चे मेजॉरिटी शेअर होल्डर होते. आई बाबांची किंमत नगण्य होती- मॅच ,निवडणुका असले मोजके प्रसंग सोडले तर. आता आई बापच उत्साहाने पाहतायेत दूरदर्शन आणि आपल्या मुलांना पण प्रोत्साहित करत आहेत. बघ आमच्या वेळी किनई कसल्या मज्जेदार सिरिअल्स असायच्या असे काही तरी सांगून मुलांना भुरळ घालतात. मुलांना आवडल्या तर उगाच यांची कॉलर ताठ. नाही तर " आज कालच्या पिढी ला टीव्ही वाल्यांनी पूर्णतः बिघडविले आहे म्हणून मोकळे. बाकी रामायण-महाभारतातील 'स्पेशल इफेक्टस' अगदीच सुमार दर्जाचे आहेत मात्र. म्हणजे त्या मालिकांनी जेवढी प्रसिद्धी मिळवली त्या मानाने. नाही तर यांच्या पेक्षा टुकार दाक्षिणात्य चित्रपटातले इफेक्टस असत.  स्टार वॉर्स पहायची सवय असलेले आमचे चिरंजीव तर ते स्पेशल इफेक्टस बघून हसतात. परंतु - डोन्ट लूक फॉर इफेक्ट्स ,फॉलो  कन्टेन्ट म्हणत मी त्याला गप्प करतो. सध्यापुरता तरी.  बाकी या मालिका प्रदर्शित झाल्या तेंव्हा एक तर काँग्रेस ( आणि जनता दल वगैरे नावाची खिचडी ) हिंदूवादी होते किंवा दूरदर्शन केंद्रात कोणी तरी प्रखर हिंदूवादी होता ज्याने या मालिका निर्मित होऊ दिल्या- आणि या हेराचा ( किंवा चोराचा ) पत्ता वर्षानुवर्षे केंद्र सरकार ला लागला नाही. दोन्ही पैकी एक काहीतरी खरे असणार . नाहीतर असल्या 'कॉम्युनल' मालिका आजच्या काळात बनविणे शक्यच नाही. 
असो -जे काय खरे आहे ते मोदी शोधून काढतीलाच.
तोपर्यंत आपण घरीच राहू आणि  रामदास बाबा कि जय म्हणत  'गो कोरोना' चा जप करू.

No comments:

Post a Comment