Thursday, October 6, 2022

भाषण मेळावा


काही वर्षांपूर्वी बरे होते राव. दसरा म्हणजे सकाळी लवकर उठून अंघोळ ,शस्त्र पूजा, देव दर्शन ,दुपारी मस्त पैकी गोड धोड जेवून ताणून द्यायची, संध्याकाळी नवीन वस्त्र परिधान करून सोने वाटायला जायचे. सीमोल्लंघन करून दिवस संपवायचा. अगदी तुम्ही संघातले असाल तर प्रभातफेरी साठी जाणे व्हायचे. तुम्ही जर नवबौद्ध असाल तर धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करीत. जे काय ते घरगुती किंवा फार फार तर आपल्या निकटच्या समाजात. त्या दिवशी राजकारण चुलीत जायचं . दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांना सुट्टी असल्याकारणाने जे काय ते दोन दिवसानेच कळे . गेले काही वर्षे मग संघाच्या नागपुरातील विजयादशमी महोत्सवाचे दूरदर्शन वाहिन्यांवर थेट प्रेक्षपण होऊ लागले. मग लागोलाग शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे प्रेक्षपण होई. नाही म्हणायला दिल्लीतील रामलीला मैदानावरच्या रावण दहन सोहोळ्याचेही प्रक्षेपण होत. परंतु त्यात फक्त पंतप्रधान बाण मारल्याचा अविर्भाव करीत. त्यामुळे कंटाळवाणे वाटत. आता तर कहरच झालाय. या वर्षी तब्बल चार पाच मेळाव्यांचे ( टेक्निकली तीन  मेळावे आणि दोन उत्सव ) थेट प्रेक्षपण झाले. अर्थात शिवसेनेचे एकाचे दोन झाले त्यामुळे भर पडली. असो तर आम्ही सर्व भाषणे ऐकली. अगदी कान देऊन ऐकली. का ? किडा दुसरे काय :). युट्युब वर उपलब्ध असल्याकारणाने ते केंव्हाही ऐकता येतात हा एक भाग झाला.आणि त्याद्वारे या नेत्यांचे निवडणुकांच्या पलीकडे विचार ऐकण्याची संधी मिळते ही भाबडी आशा .

शिंदे आणि उद्धव यांची भाषणे म्हणजे घरातील वाद चव्हाट्यावर आणण्याचा प्रकार होता. हा त्याच्यावर आरोप आणि तो याच्यावर आरोप. तिसरे विशेष असे काही नव्हते.  गर्दी किती याला काही अर्थ नसतो. ती गोष्ट नेत्यांचे इगो ठेवायला बरी असते. वाजपयी म्हणून गेले त्याप्रमाणे बघणाऱ्यांची गर्दी तर नेहेमीच असते .त्यातील किती मत देतात ते महत्वाचे. त्यातल्या त्यात शिंदे ऐकायला सच्चे वाटले. त्यांच्यावर आणि इतर आमदारांवर झालेल्या अन्यायाबद्दल ते प्रामुख्याने बोलले. त्यांनी मंत्री म्हणून केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. माणूस जबरदस्त आहे. फडणवीस म्हणाले ते सत्यच आहे. ज्यांच्या बाजूने असे कार्यकर्ते असतात ते नशीबवान असतात. मग प्रसंगी  त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदयावर का समाधान मानावे लगे ना :). परंतु एक मात्र सत्य आहे - भाजपची साथ नसती आणि सरकार स्थापणार नसते तर यातील किती आमदार स्वतः हुन अन्याय होतोय म्हणून राजीनामा द्यायला तयार झाले असते ? उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे.

ठाकरेंचे भाषण उत्स्फुर्त होते. तसेच जमावाचा प्रतिसाद जास्त चांगला होता असे वाटले. सगळेच शिलेदार गेल्यामुळे संघटनेचे पुनःनिर्माण करण्याची त्यांना चांगली संधी आहे. त्याचे किती सोने करतात कि माती हे येत्या काळात कळेलच. ठाकरेंच्या भाषणात गद्दार हा शब्द इतक्यांदा आला कि त्याचेच एक पंधरा वीस मिनिटांचे भाषण तयार झाले असते. दुसरं काही नव्हतंच म्हणा. गद्दार एखाद दुसरा करतो. पन्नास लोकप्रतिनिधी-ते हि आमदार आणि खासदार असे का करतात याची समीक्षा केली असती तर ही वेळच आली नसती. मोदींना म्हणतायत पाकिस्तान काबीज काश्मीर भारतात आणा . अहो तुम्ही चाळीस आमदार सांभाळू शकला नाहीत ! ताईंचे तर काही विचारू नका. प्रत्येक वाक्यात - तो झालेला कथित अन्याय ठासून भरला होता. नाही म्हणायला तळागाळातील समाज त्यांच्या पाठीशी आहे हे दिसले. परंतु त्यांना मार्गदर्शन काय झाले? कशा प्रकारचे समाजप्रबोधन झाले ? तसले काही नाही. फक्त सत्ता नाही याचा क्लेश आणि लढण्याबद्दल आणि संघर्ष करण्याबद्दल घोषणाबाजी. पक्षांतर्गत राजकारणात कुरघोडी झाली हे जरी मान्य केले तरी ताईनी पुन्हा सत्ता मिळवण्याव्यतिरिक्त काय वेगळा संदेश दिला ? प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे नेहेमीचंच -सगळे आपल्या विरुद्ध. मग संघ काय मोदी काय आणि पवार काय. अर्थात त्यांचे राजकारण पुढे न्यायला त्यांना ते करावेच लागणार. दुसरे काही नाहीच ना ?

संघाचे नेहेमी प्रमाणे- साचेबद्ध . उगाच भाऊगर्दी नाही कि आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न नाही . त्यांना तशी गरज नाही म्हणा. गीत , कवायती  इत्यादी. ते इतके साचेबद्ध होते कि प्रमुख पाहुण्या श्रीमती संतोष यादव यांनी भारत माता कि म्हंटलं तर जय करायलाही कोणी तयार नाही! तसा आदेश नव्हता ना ! परंतु या सगळ्यावर मात केली ती सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाने. मी ते एकदा ऐकले. समाधान झाले नाही म्हणून पुन्हा एकदा ऐकले.तुम्हाला खरं सांगतो - ऐकले नसेल तर ऐका. संघप्रमुख आवडत नसतील तर विडिओ ऐवजी ऑडिओ वर ऐका. त्यांचा आवाज आवडत नसेल तर कुठले तरी टूल वापरून आवाज मॉर्फ करून हव्या त्या नेत्या च्या आवाजात ऐका . परंतु ऐका जरूर . कोण बोलले त्या पेक्षा काय बोलले गेले हे महत्वाचे असे आम्ही नेहेमी म्हणत असतो. त्यातलाच हा प्रकार  समाज प्रबोधन कसे करावे. अशा प्रसंगांचा समाजात सुविचार पसरविण्यासाठी कसा वापर करावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भागवतांचे हे प्रबोधन. उथळ हिंदुत्व घेऊन मिरवणारे आणि त्या जोरावर प्रसिद्धी मिळवणारे बरेच आहेत आज. खास करून सोशल मीडिया च्या काळात. परंतु अविरतपणे समाजपरिवर्तनासाठी कशे झटावे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संघ आणि संघाचे वैचारिक अधिष्ठान काय हे जाणून घ्यायचे असेल तर हे भाषण जरूर एक. अधिक बोलण्याची माझी पात्रता नाही. परंतु एक सांगतो - कुठल्याही वैचारिक मर्यादा ठेवता तुम्ही हे भाषण ऐकलंत आणि नाही आवडलं तर जरूर सांगा!

 सुशांत गोसावी

No comments:

Post a Comment