"अजोबा हे सन स्क्रीन लावा म्हणजे सन चा त्रास होणार नाही. आणि हे
इन्सेक्ट रिपेलंट पण लावा".अनय आपल्या आजोबाना सांगत असतो. अर्थातच आजी आजोबा
आपल्याकडे पहिल्यांदा आलेत म्हणजे त्यांना इथले काहीच माहीत नसणार या निरागस भावनेने.
आपल्या आजोबांनी खान्देशात वरणगावला पंचवीस सर्वेयर ची नोकरी केलेली असते हे
त्याला अर्थातच माहित नसते. रणरणत्या
उन्हात हातरुमाल घामाने चिंब होई. तो चिंब रुमाल हेच काय ते त्यांचे उन्हापासून
संरक्षण! वीसएक वर्षांपूर्वी तेच आजोबा "आमच्या वेळी कि नाही एवढं ऊन होतं!
मग तरी ही आम्ही चालायचो उन्हात" वगैरे गोष्टी सांगत असते कदाचित त्या नातवाला.
परंतु आता आजोबा वयोपरत्वे अजूनच 'मॅच्युअर' झाले असतात.
त्या काळातील उदाहरणे या पिढीला आणि ते ही परराष्ट्रात देऊन काहीही उपयोग नाही हे त्यांना
ठाऊक असते.नातवाच्या प्रेमापोटी ते मुकाट्याने सांगेल तसे करतात आणि बूट घालून
बाहेर पडतात. आज वीकएंडला सगळ्यांचा नजीकच्या 'स्टेट पार्क '
ला
डबे घेऊन जायचा बेत असतो. सोबत आणखी एक दोन मित्र मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय.
थोडं हायकिंग ,धबधब्या जवळ लहान मुलांना थोडी मजा ,जेवण खाण,
चहा
आणि घरी परत -असा नेटका बेत. अगदी भूक लागलीच तर येतांना डंकिन किंवा सबवे ला
थांबणे.अर्थात आजी
आजोबांना नवीन काहीच नसते. त्यांच्या मुलांना पण.लहानपणी सिंहगड,दुर्गा
टेकडी किंवा पांडवलेणी असल्या ठिकाणी खूप सहली केलेल्या असतात. कदाचित तोच वारसा
ही मुलं आपल्या पुढच्या पिढीला देत असतात.
आजी आजोबा
अमेरिकेत येऊन महिना डिड महिना उलटलेला असतो. आले तेंव्हा गुलाबी थंडी होती. आता
थोडा उन्हाळा जाणवायला
लागतो. काही दिवसांत आजी आजोबांची एक दिनचर्या तयार होते. सकाळी उठून फिरायला जाणे,
अंघोळ
,देवपूजा , मग कागदी वर्तमानपत्राअभावी 'ई -सकाळ' किंवा ई -लोकसत्ता'
वाचणे,
भारतात
दुसऱ्या मुला /मुलीला किंवा इतर आप्तेष्टांना फोन करून खुशाली जाणून घेणे, आपण
काय काय केले हे कौतुकाने सांगणे ,अमेरिकेतील
मुलीने किंवा सुनेने नवीनच सुरु करून दिलेल्या 'फेसबुक' वर
काय काय दिसते /कळते ते कुतुहुलाने पाहणे. मग नातवंशी खेळणे ,दुपारी
वामकुक्षी आणि संध्याकाळी पुन्हा फिरणे,नवीन ओळख झालेल्या इतर आजी आजोबांशी
गप्पा मारणे. एकूण काय? आजी आजोबा 'सेटल' झालेले असतात.
वीकएंड ला छोट्या सहली , 'ग्रोसरी' आणि शॉपिंग असला
कार्यक्रम. वरकरणी 'सगळे भारतासारखे' दिसत असले तरी त्या
भाजी च्या दुकानातील स्वच्छता, १५ दिवस वगैरे टिकणारे दूध , 'इंडियन
स्टोर' मध्ये भारतात कधीही न पाहिलेले जिन्नस, दुकानांची
भव्यता, विविध प्रकारची उपहारगृहे या गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.
आजी आजोबांना एकंदरीत अमेरिकेतील राहणीमानाचा अंदाज येतो. चांगल्या गोष्टी कळतात
आणि वाईटाचा पण अंदाज येतो. घरातही नव्याचे नऊ दिवस संपून कधी छोटे मोठे तणावाचे
प्रसंग निर्माण होतात. आपल्या तिघा/चौघांच्या संसाराची सवय असलेल्या मुलांना
आई-वडील/सासू सासऱ्यांसोबत ऍडजस्ट होणे थोडे अवघड जातेच. आयुष्याचा एक दृष्टिकोन असलेल्या आजी
आजोबांनाही काही गोष्टी न राहून बोलाव्या वाटतातच .
"अनय ला सारखा
पिझ्झा नका देत जाऊ .चांगलं नाही ते ", “कुठे सारखा देतोय. तुम्ही नसता इकडे.
वर्षभर तो हेल्थी गोष्टी खातो. आता उगाच सुट्टी आहे म्हणून"
“तुला म्हंटलं होतं खिचडी टाक .पुरली
असती सगळ्यांना .तशीही कुठे भूक होती फार? तर तुम्ही बाहेरून जेवण मागवलं .आता काय ? खा शिळे ".“चालतंय
अमेरिकेत खातात. इथे फ्रिज मध्ये राहते दोन तीन दिवस ", “तरी
काय? शिळे ते
शिळेच"
“बiबा
तुम्ही तांबे काकांना बोलले होते का आम्ही न्यू जर्सी ला येणार म्हणून? आता ते अग्रहः करताहेत. उगाच नक्की
नसतांना कशाला सांगायचं कोणाला ?" , “मला काय माहिती इतके अवघड असेल? कोणी तरी म्हंटले २ तासांवर आहे. म्हणजे पुणे साताऱ्यासारखे. मी म्हणालो
नक्की येऊ ".
असले
छोटे मोठे विसंवाद होतातच. परंतु हि पहिली वेळ नसते. आणि शेवटची नाहीच !
मतभेदांमुळे मनभेद होऊ नयेत याची सगळेच काळजी घेतात आणि प्रसंग निभावून नेतात. या
सगळ्यात सर्वात मोठी गोची होतात ती मात्र 'अनय' ची
! आता पर्यंत टीव्ही पाहण्याचे सर्वतोपरी अधिकार असलेल्या अनय ला नाईलाजाने आजी
साठी वाट करून द्यावी लागते. स्पॉन्जबॉब कॅप्टन अमेरिका ,पोकेमॉन,स्टार वॉर यांची जागा माझ्या नवऱ्याची बायको , जीव रंगला वगैरे मालिका घेतात. "Wasn't that Radhika saying the same stuff
last time we went to India ? Do these guys keep on repeating the same stuff
again and again?" म्हणत अनय आपला विरोध दर्शविण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याचा काही
उपयोग होत नाही. त्याला बिचाऱ्याला काही तरी अमिश दाखवून शांत केले जाते. राधिका चालू राहते
याच दरम्यान
मुलं/मुली लांबच्या ' ट्रिप' चे नियोजन करण्यास सुरुवात करतात.
उत्तरपूर्व अमेरिकेत राहणारे सहसा चार धामच्या सहलीची योजना आखतात. नायगरा फॉल्स , न्यू यॉर्क शहर , वॉशिंग्टन डी .सी हे तीन धाम निश्चित असतात. चौथे धाम हे
राहण्याच्या ठिकाणानुसार बदलते. बोस्टन, वर्जिनिया बीच , शार्लेट
,फिलाडेल्फिया ,हर्शे ची चॉकलेट फॅक्टरी ,फ्लोरिडा या पैकी कुठले हि स्थळ
निवडण्यात येते. सुट्यांचे नियोजन केले जाते. वीकएंड ला जोडून ट्रिप प्लॅन केल्या
जातात. विमानांची तिकिटे आरक्षित करणे,रेंटल कर बुक
करणे , हॉटेल्स बुक
करणे हे सगळे झाले कि कुठल्या ठिकाणी काय काय पाहायचे याचे नियोजन होते . रिपीट
जर्नी वाल्यांचे हे सगळे पाहून झालेले असते. त्यामुळे त्यांच्यासाठी 'वेस्ट कोस्ट' किंवा
'मिड वेस्ट' ची योजना आखली जाते. किंवा एखाद्या
राष्ट्रीय उद्यानात 'कॅम्पिंग' ची. आजी आजोबा अर्थातच उत्साहित असतात.
परंतु " फार खर्च करू नका रे " असा सल्ला पण देतात. घरात राहून टीव्ही
पाहण्यावर निर्बंध आलेला नातू पण या सहलींसाठी मग उत्साही असतो.
ट्रिप साठी मोघम
खरेदी केली जाते, चिवडा, शंकरपाळ्या असले ड्युरेबल पदार्थ बनवले
जातात. अर्थात हि परंपरा सासू सुना दोघीही मोडीत नाहीत. प्रवासादिवशी मेथीचे पराठे
, लाल भोपळ्याच्या
घाऱ्या घेऊन मंडळी सकाळी सकाळी 'गणपती
बाप्पा मोरया ' म्हणत
प्रवास सुरु करतात. रस्त्यात
पाण्याच्या बाटल्या आणि डंकिन ची डोनट्स
उचलेले जाता.
स्टॅचू ऑफ लिबर्टी पाहण्याचे आजोबांचे स्वप्न आज पूर्ण होते. सोबतच एम्पायर इस्टेट
वरून न्यू यॉर्क पाहण्याचे. टाइम्स स्क्वेयर ला काय विशेष हे मात्र दोघांना कळत
नाही. नायगरा फॉल्स तर अद्भुत आनंद देतो. तो महाकाय जगविख्यात धबधबा जमेल तेवढा
डोळ्यांत सामावून घेण्याचा प्रयास आजी आजोबा करीत असतात. इतके वर्ष ज्याला आपण 'व्हाईट हाऊस ' समजत होतो ते 'कॅपिटॉल हिल " आहे हे
समजल्यावर थोडे दुःख होतेच. परंतु
अमेरिकेची राजधानी पाहिल्याचे समाधान पण. वॉशिंग्टन चा प्रसिद्ध मॉल परिसर फिरून फिरून पाय दुखायला लागतात. अर्थात पर्यटन म्हणजे चालणे आलेच. अगदी
खान्देश विदर्भासारखी नसली तरी इथल्या उन्हाची तीव्रता बऱ्यापैकी असल्याचे त्यांना
जाणवते. त्यामुळे , नाव
नवीन ठिकाणे पाहण्याचे औत्सुख्य आणि वयपरत्वे आणि उन्हाळ्यामुळे येणारा थकवा यांचा
मध्य साधत ती सहल पूर्ण होते.मुलांनी फिरवून आणल्यामुळे आजी आजोबांना कृतज्ञ वाटते.
रात्री आई मुलांजवळ जाते. "गाडी
चालवून दमले असाल ना रे "?
किंवा तू झोप ! सकाळ लवकर उठून सगळा सवयंपाक केला आहेस ! शिवाय ट्रिप
मधली धावपळ! असले मायेचे शब्द उच्चरत डोक्यावरून हात फिरवते. ती माया ट्रिप पुरती
मर्यादित नसते. जे पेरलंय ते चांगलं उगवलंय याची ती पावती असते आणि या पुढे असेच
आनंदी रहा -हा आशीर्वाद
क्रमश: