Saturday, May 13, 2023

ओव्हर बट नॉट आऊट

                 पूर्वी जेंव्हा भारताची मॅच असायची तेंव्हा सचिनची विकेट पडली की टीव्ही बंद करायचो. दुसरी बॅटिंग असेल तर हमखास करायचो. कारण आता भारत हरणार याची खात्री असायची. क्वचित काही मॅचेस अशा ही असायच्या जेंव्हा सचिन पण पहायची गरज नव्हती पडत. म्हणजे साक्षात देव पण आपल्याला या पराभवापासून वाचवू नाही शकणार ही खात्री होती. कर्नाटकाची मॅच पण तशीच होती. एरव्ही निवडणुकीचे निकाल म्हंटल्यावर मी आधीच टीव्ही वर हक्क सांगितला असतो. मग भारतीय वेळेनुसार अगदी पाऊणे आठ पासूनच बातम्या बघायला सुरुवात करायची- आधीच्या बातम्यांना 'पोस्टल बॉलॉट ' म्हणून धुडकारून लावायचे मग हळू हळू कल स्पष्ट व्हायला लगे . साधारण दुपारी दोन अडीच पर्यंत चित्र पूर्णपणे स्पष्ट होतं . मग झोपायचे .  यावेळी टीव्ही लावलाच नाही. निकालाची खात्री होती. झोपून घेतलं . उठलो तेंव्हा एवढीच उत्कंठा होती की भाजपा किती आपटला. काँग्रेस निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेघ होती. प्रश्न एवढाच होता कि सरकार देवेगौडांची पार्टी सोबत घेऊन बनवणार कि एकटे. म्हणजे भाजप हरल्यामुळे किंवा काँग्रेस जिंकल्यामुळे आम्ही काही निराश वगैरे झालो नाही बरं का !  परंतु वर दिलेल्या सचिनच्या उदाहरणाप्रमाणे ज्या निवडणुकीत मोदी पण भाजपाला वाचवू शकणार नाहीत हे दिसतंय त्याचा निकाल अजून काय वेगळा लागणार ? हे अभिप्रेत होते.

या निकालाची कारणमीमांसा करण्यात फार वेळ घालवण्यात अर्थ नाही. भाजप बाबतीत -स्थानिक मुद्दे ,बंडखोरी, अँटी इन्कमबंसी  हे तर झालेच .त्यासोबत एवढेच सांगेन कि भाजपच्या प्रचारतंत्रात तोच तोच पणा आलाय. निवडणुकीदरम्यान काही भावनिक आणि धार्मिक  मुद्दे उपस्थित करणे , मोदींच्या प्रचंड सभा आणि रोड शो , लागलेच तर कुठलासा वादग्रस्त चित्रपट त्यादरम्यान प्रदर्शित करवून घेणे इत्यादी गोष्टी आता नेहेमीच्या झाल्यात. पूर्वी आठवतंय - एखादा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्यातील अभिनेता किंवा अभिनेत्री कुठल्यातरी वादात अडकायचे. वयक्तिक किंवा राजकीय/सामाजिक इत्यादी. प्रसिद्धी आपसूक मिळायची आणि चित्रपटाला भरगोस फायदा व्हायचा. पुढे जसे प्रेक्षक हुशार झाले तशी ही 'ट्रिक' चालेनाशी झाली आणि चित्रपट डब्यात जायला लागले . तीच  गत भाजपची होत चालली आहे. किंबहुना करोडो रुपये खर्चून आयोजित केलेल्या मोदींच्या त्या महाकाय सभा आणि रोड शोचा पक्षाला किती फायदा होतोय याचा त्यांनी विचार करायला हवा. भाजपाच्या अति आक्रमक प्रचाराचा त्यांना फायदा कमी आणि तोटाच जास्त होतोय असे दिसते आहे. एक गुजरात सोडले तर इतर ठिकाणी हेच दृश्य आहे. तर भाजपच्या रणनीतीकरांना एकच संदेश - बी क्रिएटिव्ह.

या निकालाचे खास  वैशिष्टय म्हणजे - हा कौल जेवढा भाजपाविरोधात होता तेवढाच काँग्रेसच्या बाजूने होता. आणि हे बरेच वर्षांनी अनुभवायला मिळाले. २०१४ नंतर भाजपचा अनेक राज्यस्तरीय निवडणुकीत पराभव झाला आहे. जेथे जेथे काँग्रेस विरुद्ध थेट लढत होती तेथे भाजपच्या परंपरागत मतदाराने साथ सोडली नाही. म्हणून मत टक्का शाबूत राहिला. विरोधक एकटवल्यामुळे म्हणा किंवा कोणा एका घटकाने एकमुठी मतदान केल्यामुळे भाजपचा पराजय झालेला दिसतो. कर्नाटकात पहायचे झाले तर बेंगळुरू, दक्षिण कर्नाटक असे एक  दोन अपवाद वगळता सर्वत्र काँग्रेस ने भाजपाला मात दिली आहे . काँग्रेसची मतांची  टक्केवारी सुमारे टक्क्यांनी वाढली आहे. भाजपाची एक ते डिड टक्क्यांनी कमी झाली आहे. जनता दलाची मते आणि जागा पण काँग्रेस ने खाल्ल्या. याचाच अर्थ कि काँग्रेसला मतदान केलेला वर्ग हा फक्त भाजपाला वैतागलेला नव्हता तर काँग्रेसकडे आशेने बघणाराही एक छोटा का होईना वर्ग निर्माण होऊ पाहतोय. हा बदल भारत जोडो यात्रेमुळे झाला कि अन्य कशामुळे झाला, तो पुढे कायम राहील कि एकवेळचा चमत्कार होता या गोष्टींबद्दल आत्ता काही निश्चित सांगता नाही येणार. परंतु वाळवंटात अंकुर फुटलाय हे निश्चित. आणि ही काँग्रेससाठी आनंदाची तर भाजपसाठी धोक्याची घंटा असली पाहिजे .

 या निवडणूक निकालांचे दूरगामी परिणाम होतात का हे प्रामुख्याने विविध घटक त्या निकालाचे कसे विश्लेषण करतात आणि काय पाऊले उचलतात यावर अवलंबून आहे. काँग्रेसचे शशी थरूर यांनी आत्ताच - बेफिकीर राहून चालणार नाही हा इशारा दिला आहेच. मोदींची जादू कमी होत चालली आहे असा  एक निष्कर्ष काढला जाऊ लागला आहे. त्यात थोडेफार तथ्य जरी असले तरी एक लक्षात घेतले पाहिजे कि फक्त मोदींच्या नावावर आणि जीवावर निवडणूक लढवणाऱ्यातली भाजप नाही. त्यांचा कोठे कसा वापर करून घ्यायचा हे पक्ष ठरवतो . भाजप वरकरणी जरी मोदींवर अवलूंबून आहे अशी वाटत असली तरी  तयारीच्या दृष्टीने बघायचे झाले तर ती नव्वदीच्या दशकातील भारतीय क्रिकेट टीम नाही जी सचिन वर अवलूंबून राहते - ती ऑस्ट्रेलिया आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ,बूथनिहाय विश्लेषण होणार - कुठे चुकलो , काय अंदाज चुकीचे ठरले हे अगदी बारकाईने पहिले जाणार आणि चुका दुरुस्त केल्या जाणार हे निश्चित. कारण मोदी हे जाणतात कि आधी  'सत्ता है तो मोदी है'  येतं आणि मग मोदी है तो मुमकिन है हे येतं ! विरोधकांचे म्हणाल तर त्यांच्या एकजुटीचे प्रयत्न गेल्या कर्नाटक निवडणुकीपासून सुरु आहेत. अर्थात गेल्या काही राज्यस्तरीय आणि पोट निवडणुकांमध्ये त्याचे महत्व बऱ्याच पक्षांना कळून चुकलंय. त्यामुळे यावेळी सगळे जरा 'सिरीयस' आहेत असा भास होतोय. परंत सरतेशेवटी कोण कोणाला किती जागा सोडतो यावर विरोधकांच्या एकजुटीचा डोलारा उभा राहणार आहे . पाया गंडला तर तो उभा राहण्या आधीच कोसळणार . आणि भाजपला हे नेमके माहिती आहे. नव्हे - तेच त्यांच्या यशाचे गमक आहे. शिवाय या यशामुळे काँग्रेसला थोडे अजून मांस चढणार हे निश्चित .त्यामुळे दिल्ली बहोत दूर है असेच म्हणावे लागेल सध्या तरी

येत्या वर्षभरात अजून पाच -सहा  राज्यांच्या निवडणुका होणे आहेत . जवळपास सर्व राज्यांमध्ये भाजप एकतर सत्तेवर आहे किंवा येऊ इच्छिते . त्यामुळे घमासान होणार हे निश्चित . काहीही झाले तरी तुम्ही शांत रहा - निवडणूकाच  आहेत . युद्ध नाही.

 

सुशांत गोसावी

Monday, February 13, 2023

यह पब्लिक है -

लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट पडल्यावर जी चूक बॉयकॉट वाल्यांनी केली होती - म्हणजे आपण  फुंकर मारली म्हणून वादळ आलं - हे समजण्याची , तीच चूक , नव्हे तीच्या तिप्पट चूक फेकुलर करतायत. इथे मुद्दामून मी बॉयकॉट विरोधक हा शब्द नाही वापरला. कारण बॉयकॉटचा विरोध करणारे सामान्यजन पुष्कळ आहेत. जसा बॉयकॉटचे समर्थन करणारा प्रत्येकजण हा काय संघी नाही तसेच त्याचा विरोध करणारा प्रत्येकजण या संघ विरोधकही नाही. मुळात संघ बॉयकॉट समर्थक आहे असे कुठेही संकेत नाहीत ! असा एक फार मोठा समाज आहे जो परिस्थितीचे योग्य ते आकलन करून निर्णय घेतो. अशा समाजाला गटांमध्ये विभाजित करणे ही फार मोठी व्यासायिक चूक असते. ती राजकीय चूक सुद्धा असेल. परंतु त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी. तूर्त आपण मला बोलायचंय त्या मूळ मुद्द्याकडे वाळू

  हिंदी चित्रपट सृष्टीत बऱ्याच समस्या आहेत. म्हणजे  वशीलेवजी (nepotism) , काही बड्या लोकांची मक्तेदारी, सर्जनशीलतेचा अभाव, अभिनयातील तोच तोच पणा ,प्रेक्षकांशी दुरावत चाललेले नाते आणि विशेषकरून किंवा आधी नमूद केलेल्या कारणांमुळे ढासळत चाललेला चित्रपटांचा दर्जा. या सगळ्यांची परिणीती ही चित्रपट व्यासायिकदृष्ट्या पडण्यात होत गेली. हा काय एका रात्रीत घडलेला बदल नव्हता. परंतु वर्षानुवर्षे प्रक्रिया सुरु होती .या सगळ्यात धर्माचा किंवा राजकीय विचारसरणीचा तसा संबंध नव्हता किंबहुना असायला नको होता. परंतु पाच सात वर्षांपूर्वीपर्यंत ज्या लोकांची मक्तेदारी होती ते एका विशिष्ट समुदायाचे होते-कदाचित योगायोगाने असेल किंवा वशीलेबाजी मुळे असेल किंवा मग -काही म्हणतात त्याप्रमाणे एक पद्धतशीर कटाचा भागही असू शकतो .अशी परिस्थिती होती कि फक्त नावावर चित्रपट काहीशे कोटींचा व्यवसाय करीत. त्यामुळे मग अशा लोकांना एक घमेंड चढला. चित्रपटांचा दर्जा ढासळला हे सांगायला नको. आणि परिणीती चित्रपट दणदणीत अपटण्यात झाली.वास्तविक हिंदी चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांनी आपली मक्तेदारी स्थापित केली आहे. दर काही वर्षांनी नवीन पात्र येतात आधीचे प्रभावहीन होतात. एक पिढी अस्ताकडे जाते. नवीन पिढीचा उदय होतो .काही वर्षांपूर्वी ती खान लोकांची आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी होती. नव्वदीच्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीवर खान मंडळींचा उदय झाला आणि दरारा वाढू लागला. पुढील दोन दशकांत त्यांनी अनभिषिक्त अधिपत्य निर्माण केले. दाऊद आणि  गुन्हेगारी विश्वाच्या बेड्यांतून मुक्त होऊ पाहणारी चित्रपटसृष्टी आणि कॉर्पोरेट मंडळींची गुंतवणूक या मधल्याकाळात ज्या काही बड्या निर्माते कलाकार मंडळींनी आपली सत्ताकेंद्रे निर्माण केली त्यात खान मंडळी अग्रेसर होती .

प्रामुख्याने या कारणामुळे या प्रकरणाला एक वैचारिक आणि धार्मिक रंग दिला गेला. योगायोगाने किंवा भारतात नवीन राजकीय वारे वाहू लागल्यामुळे असेल कदाचित - ' राष्ट्रवादी ' ( काकांचा काहीही संबंध नाही हे लक्षात घ्या) चित्रपटांचा सुळसुळाट सुरू झाला. सुरुवातीचे प्रचंड गाजले. मग बॉलिवूडच्या परंपरेनुसार जो तो अशाच कथानकावर चित्रपट काढत सुटला. मग निकृष्ट चित्रपट सुद्धा गल्ला भरू लागले. आणि याच दरम्यान प्रामुख्याने टुकार चित्रपट ( काही अपवाद सोडता) बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने काही अप्रतिम चित्रपट निर्माण केले. तर बॉलिवूडच्या बड्यांच्या मक्तेदारीला आणि टुकार चित्रपटांना कंटाळलेला प्रेक्षकवर्ग, राष्ट्रीय विचार असलेले( किंवा तसे भासाविणारे) नवीन चित्रपट यांची निर्मिती आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे चांगले प्रदर्शन या सर्वांमुळे एक भेद निर्माण झाला. त्यात Covid मुळे चित्रपटगृहे बंद असणे, चांगल्या इंग्रजी चित्रपटांची प्रादेशिक भाषांतरे उपलब्ध होणे, टी टी चा वाढता प्रभाव या सगळ्यांची भर पडली.राजकीय वातावरण तापलेले असतेच . मग या भेदाचा आणि चित्रपटांच्या निर्माते, कलाकार यांचा वापर राजकीय अजेंडा साठी सुरू झालासर्वच बाजूंनी.

या प्रकरणाला काही अस्सल राजकीय आणि आर्थिक कारणे सुद्धा आहेत. एवढी प्रभावशाली चित्रपटसृष्टी मुंबईतून का व्यवसाय करते ? हिंदी चित्रपटांची निर्मिती मुंबईतून का होते ? हा प्रश्न विचारणारा एक वर्ग कायम होताच. हिंदी चित्रपटसृष्टीला एका उत्तरेकडच्या राज्यात हलविण्याचे प्रयत्न गेले दोन दशके होत आहेत. पार मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री होते तेंव्हापासूनहा व्यवसाय इतरत्र हलवायचा तर - एकतर आहे तसा हलविणे किंवा आहे तो उधळवून नवीन चित्रपटसृष्टीची निर्मिती करणे - असे दोन पर्याय होते अशा शक्तींकडे. त्यांनी दोन्ही दृष्टीने प्रयत्न सुरु केले . शिवाय मुंबईचे आर्थिक प्राबल्य कमी करण्यासाठीही एक वर्ग झटतोय अनेक वर्षेहिंदी चित्रपटसृष्टी ही मुंबईच्या अनेक आर्थिक आणि सांस्कृतिक बलस्थानांपैकी एक . तीला धक्का दिला तर मुंबईचे अपरिमित नुकसान होईल . त्यामुळे प्रस्थापित हिंदी चित्रपटसृष्टी - म्हणजे बॉलीवूड ला खाली खेचायला बघणारे किंवा तशी मनीषा असणारे अनेक होतेच. हे सगळे होत असतानाच सोशल मीडियाचा प्रभाव वाढत होता . एका क्षणात काहीही बातमी जगाच्या कान्याकोपऱ्यात पोचवली जाऊ शकते हे लोक आश्चर्याने बघत होते. या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा जसा चांगल्यासाठी वापर झाला तसा काही हितसंबंध जपण्यासाठी अथवा बिघडण्यासाठी होऊ लागला.  बहुसंख्यिक लोक जर एखाद्या विचारा विरोधात असतील - मग तो विचार किंवा ती विचारधारा खरोखर अस्तित्वात असो किंवा कोणी आभास निर्माण केला असो  - तर त्या विचारला - कधी तर उत्पादनांना विरोध करण्याची पद्धत सुरु झाली - ज्याला आपण कॅन्सल कल्चर  किंवा बॉयकॉट कल्चर म्हणून ओळखतो . लोकांना आपली ताकद नव्यानेच कळली होती. मग तिचा अमर्याद वापर सुरु झाला. काही चांगले घडले - बरेच वाईट. असो- तर या कॅन्सल कल्चरने प्रचलित चित्रपट पाडण्यात कॅटलीस्ट ची भूमिका बजावली.

दरम्यान काळ पुढे  सरकला होता - राष्ट्रवादावर आधारित चित्रपटांचा सुळसुळाट होत चालला होता. त्यातील बहुतेक सुमार दर्जाचे होते आणि तोच तोच पणा होता. काही तर सरळ सरळ प्रोपागंडा सिनेमे होते आणि ते उघड उघड दिसत होते. लोक कंटाळले - शेवटी ते पैसे मोजत होते. त्यांना काहीतरी वेगळे हवे होते - बऱ्याच वर्षांनी शाहरुख चा चित्रपट येत होता . तो ही स्पाय युनिव्हर्स या विषयावर. लोकांनी हे गर्दी केली. चित्रपट व्यासायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी झाला. या यशाला बॉयकॉट वाल्यांचा पराभव असे रूप देण्यात आले. मुळात ज्या विचाराचा चित्रपटांच्या यशापयशावर अगदी मर्यादित परिणाम होता त्याला एक भयानक राक्षस दर्शवून त्याच्या विरुद्धच्या विजयाचे पोवाडे गायले जाऊ लागले. फेक्युलरांना तर तौबा आनंद झाला! आता जणू मोदींपासून संघापासून सगळे पराजित झालेत - नफरत कि हार मोहोब्बत कि जीत वगैरे गुणगान सुरु झाले.  परंतु एक लक्षात घ्या - हिंदी चित्रपट पडायला वर नमूद केलेली कारणे प्रामुख्याने जवाबदार होती. कॅन्सल किंवा बॉयकॉट कल्चर ही योगायोगाने त्या वेळेत सुरु असलेली  एक सामाजिक चळवळ होती. एका चित्रपटाच्या चालण्याने जर लोक -खास करून चित्रपट अभिनेते आणि निर्माते मूळ कारणांकडे डोळझाक करून या असल्या कॅन्सल बीन्सल गोष्टींकडे गांभीर्याने बघू लागले तर पुढील चित्रपटांची गत अजून वाईट झाल्याशिवाय राहणार नाही.

शेवटी काय ? यह पब्लिक है ...ये सब जाणती है - होय ना ?

सुशांत गोसावी 

१३-०२-२०२३