Saturday, June 26, 2021

समाज माध्यमांतील वर्गभेद - एक ( अनावश्यक ) प्रबंध

             "काय बरेच दिवस काही पोस्ट नाही ? फेसबुक अकाऊंट बंद केले कि काय ? नाही म्हणजे आज काल बरेच जण बंद करतायत म्हणून विचारले "- एक मित्र- हो म्हणजे मित्रच म्हणायचे आता त्याला , विचारत होता .याला माझ्या पोस्ट लिहिण्याने अथवा लिहिण्याने काहीही फरक पडत नसणार. परंतु समोर भेटलेल्याला आपण सहज "काय झाले का जेवण " म्हणून विचारतो ना ? तसलाच प्रकार. समोरचा नाही म्हणाला तर लगेच "हो का ?अरेरे ! चला आमच्या घरी .जेवायला वाढतो " असे म्हणणारा अजून आम्हाला तरी भेटायचा आहे. बाकी एक गोष्ट मात्र तो बरोबर बोलला .आजकाल फेसबुक खाते बंद करायचे किंवा निष्क्रिय राहण्याचे नवीनच फॅड निघाले आहे. फेसबुकवर ऍक्टिव्ह असणे डाउन मार्केट समजले जाऊ लागले आहे. सोशल मीडियावरील "क्लास वॉर " मध्ये फेसबुक कधीही अव्वल नव्हतेच खरे. फेसबुक म्हणजे बॉलीवूड चा बी ग्रेड  गल्लेभरू चित्रपट. त्याला ना  कपूर चोप्रा ,खान नावांचे वलय आणि ना सत्यजित रे ,गोविंद निहलानी वगैरेंचे कर्तृत्व. फेसबुक म्हणजे चितळेंच्या पुण्यातील गल्लीतला कोणी भायल स्वीट्स. कितीही चांगला माल विकला तरी कायम तिसऱ्या नंबरवर. फेसबुक म्हणजे तुळशीबाग. व्हॅल्यू फॉर मनी तिथेच मिळते हे सगळेच जाणतात. परंतु तिथून खरेदी केली हे सांगायला कमीपणा वाटतो. तर इतर गोष्टींप्रमाणे सोशल मीडियावरही वर्ग भेद असतात बरं का ? म्हणजे मानवी स्वभावात असलेले भेद सोशल मीडियावर झळकतात असे म्हणू.

या सोशल क्लास वॉर्स मध्ये सर्वोच पदावर असतो तो लिंकडीन वापरणारा- किंबहुना लिंकडीन वरील सक्रिय गट. निव्वळ पेठेत राहण्याने जसा पुणेकरांना माज दाखविण्याचा मूलभूत अधिकार मिळतो, किंवा केवळ भारतीय असल्याकारणाने फूटभर ढेरीवाले सुद्धा  'योगा' वर आपला अधिकार सांगतात तसेच लिंकडीन वर साधा लाईक ठोकणारा सुद्धा पौरोहित्याचे अधिकार मिळवतो आणि "ऑल अदर सोशल मीडिया ईझ युझलेस" म्हणायला पात्र ठरतो. बरं नोकरी धंद्यासंदर्भात असल्याकारणाने लिंकडीन तसेही वलयांकित असणार यात शंका नाही. त्यात ( काही अपवाद वगळता ) कोणालाही कळणारे - निबंध टाकले ? कि तुम्ही जग जिंकलेच म्हणून समजा ! एखाद-दुसऱ्या उच्चपदावरील साहेबाचे  'कनेक्षन ' असेल आणि अनुमोदन मिळाले असेल तर विचारूच नका !  अर्थात केवळ आवड म्हणून त्या विषयांत रुची घेणारा असा एक अल्पसंख्य वर्ग आहे आणि त्यांचे विचार रंजक असतात. परंतु केवळ लिंकडीन वर वावरण्याने चार फूट हवेत चालणारे ( आणि इतरांना तुच्छ लेखणारे) "विद्वान" बरेच आहेत. हे हवेत चालत असल्याकारणाने भूतलावरील इतर माध्यमांशी स्पर्धा करण्याचा -किंबहुना विचारही करण्याचा काही संबंधच येत नाही. फेसबुक वगैरे म्हणजे तर यांच्यासाठी कुंटणखाना आहे. अर्थात यांच्या चोरून केलेल्या हरकती पाहून " हमको जो ताने देते हैं हम खोये हैं इन रंगरलियों मेंहमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियों में " या किशोरदांच्या ओळी आठवतात तो भाग वेगळा !

भूतलावरील माध्यमांचा विचार केला तर निर्विवाद वर्चस्व हे whatsapp  चे. यालाही पाण्यात पाहणारा वर्ग आहेच . परंतु whatsapp सगळ्यांच्याच आयुष्याचा आवश्यक घटक झाल्याकारणाने सरसकट बंद करण्याची हिम्मत दाखवणारा कोणी भेटला नाही ( म्हणजे whatsapp सोडून सिग्नल , टेलिग्राम वगैरे वापरणारे  तो वर्ग वेगळा. ते म्हणजे  रेड लेबल सोडून शिवाज रिगल घेणारे ). परंतु गम्मत बघा - गुणात्मक दृष्ट्या whatsapp आणि फेसबुक वरील "साहित्यात' ( आता साहित्यच म्हणायचे त्याला -दुसरे काय ?) काहीही फरक नसला तरी whatsapp वाले पण फेसबुक वाल्यांना पाण्यात बघतात बरं का ! दोघांचा मय बाप एकचं आहे हे माहित असून सुद्धा !  सच इझ क्लास कन्सेप्ट दीप रूटेड इन सोसायटी - काय सांगू तुम्हाला ! या नंतर येतात ते  ट्विटर वाले. यांचा फेसबुक वाल्यांशी तसा संघर्ष नसतो. म्हणजे ते वर्गभेद करीत नाहीत. परंतु ऋग्वेदी आणि यजुर्वेदींमध्ये जसा कर्मकांडाचा भेद असतो तसा ट्विटर आणि फेसबुकवाल्यांमध्ये असतो. दिवसातून १० वेळा चर चर करणारे  - 'अनलिमिटेड थाळी' लोक कशी खाऊ शकतात हे समजूच शकत नाहीत. आणि फेसबुक वाले  " फुल्ल थाळी का मज्जा तुम क्या जानो बाबूजी" करीत यांची मज्जा घेतात. परंतु केवळ  राजकीय दृष्ट्या वजनदार आणि संवेदनशील असल्याकारणाने ट्विटर वरच्या वर्गात स्थान मिळवते. या नंतर येतो तो इंस्टाग्राम. हे म्हणजे बाप से बेटा सवाई असा प्रकार आहे. परंतु नवीन पिढीला ते भावले आणि फोटो बघायला मिळत असल्याकारणाने अनेकांनी पार्टी बदलली . नव्या पिढतील तर गेलेच परंतु त्यांना पाहण्यासाठी म्हातारी धोंड पण मागोमाग पळाली . बाकी पिनारेस्ट ,कोरा वगैरे म्हणजे आपल्या प्रादेशिक पक्षांसारखे आहेत . ठरविक वर्गाला भावतात. परंतु फेसबुकला कमी लेखायला मागे पुढे पहात नाहीत.

असो तर थोडक्यात काय ( थोडक्यात काय ते सांगत जा हा फिडबॅक आज काल वारंवार मिळत चाललाय ) तर या वर्गीकरणात फेसबुक अगदी खालच्या तळाला आहे. बरं फेसबुक वापरणाऱ्यांच्यात  एकजूट असली तर नवल ! त्यांच्यात हजार पोटजाती! वर सांगितल्याप्रमाणे निष्क्रिय राहणारा एक मोठा गट आहे. यांना फेसबुक वापरणे म्हणजे डाउन मार्केट वाटते. परंतु इतरांच्या घरात काय चाललंय हे हळूचकन बघण्याची इच्छा जात नाही. त्यामुळे ते बघत सगळे असतात. प्रक्रिया मात्र देत नाहीत. त्यांच्या खालोखाल येतात ते फक्त लाईक्स ठोकणारे. मग फक्त आणि फक्त " हैप्पी बर्थडे " च्या शुभेच्छा देणारे. मग रोज उठून गुड मॉर्निंग म्हणणारे. देवी देवतांच्या फोटोला नमस्कार ठोकणारे, फेसबुक वरील राष्ट्रप्रेमी वगैरेंचा त्यानंतरचा क्रमांक.  कधीतरी उठून आठवले कि आपण फसेबूकवरही आहोत म्हणून  प्रोफाइल फोटो बदलणारे किंवा कोणालातरी उगाच " कसा आहेस लॉन्ग टाईम नो सी " वगैरे संदेश पाठविणारे मध्येच घुसतात. सरतेशेवटी उरतात ते प्रकारातील लोक . मोदीभक्त. हे सगळीकडेच असतात. परंतु ट्विटरवर मोजकेच शब्द लिहिता येतात! त्यामुळे फेसबुक हे यांचे हक्काचे स्थान. आणि प्रोटॉन असला कि इलेक्ट्रॉन हवाच ! या सिद्धांताप्रमाणे जेथे भक्त तेथे विरोधक आलेच ! त्यानंतर येतात ते -साहित्यिक. यांना त्यांच्या लिखाणाबद्दल फारच भाबड्या आशा असतात. त्यामुळे ते " मेरे करण अर्जुन आयेंगे " प्रमाणे कधीतरी मान आणि मान्यता मिळेल या आशेने झुंझ देत असतात. सर्वात खालचा नंबर लागतो तो फेसबुक पेज चा. हे पेजेस का आणि कोणासाठी बनलेली असतात कोण जाणे. परंतु उगाच वातावरण प्रदूषित करीत असतात. किंबहुना फेसबुकच्या अधःपतनात यांचा सर्वात मोठा वाटा आहे.  एवढे सगळे असूनही फेसबुक म्हणजे एस टी  सारखे आहे. आजही त्याच्या जीवावर प्रवास करणारे असंख्य " निष्ठावंत" आहेत !

परवा ही म्हणत होती- तुझा इंस्टग्राम प्रोफाइल बनव. मी म्हणालो नको मला. मी आपला फेसबुक वाल्या ओल्डीस मध्येच शोभतो. पूर्वी पत्र असायची मग फोन,-मेल आले. उद्या आणखी काही येईल. शेवटी काय ? लिंकडीन असो अगर इंस्टाग्राम माणसं जोडलेली असणे  महत्वाचं. नाही का ?

Sunday, May 2, 2021

उतावीळ नवरे

               जगात उतावीळ नवऱ्यांची कमी नसते.आता बघा ना- बंगाल निवडणुकीआधी सोशल मीडियावर मोदी -शहांच्या सभांची जी चित्रणे पसरवली जात होती त्यावरूनतर तृणमूलच्या अर्ध्या उमेदवारांचे डिपॉसिट जप्त होईल असा ग्रह बरेच जण करून बसले होते. आता फक्त मुख्यमंत्री निवडायचा ( म्हणजे मोदी -शहांनी ) आणि सत्ता आपलीच अशाच अविर्भावात होते. आता "सत्ता आपलीच" मध्ये 'आपण' ची व्याख्या म्हणजे एक गंमतच आहे. महाराष्ट्रातील संगमनेर तालुक्यातील इळपुंजे गावातील कुक्कुटपालन केंद्रात कंत्राट पद्धतीने काम करणारा  गणू कोथमिरे, शेकडो मैल लांब कोलकोत्यात कोणी घोष किंवा चॅटर्जी मुख्यमंत्री होणार म्हणून नाचत सुटतो. का ? तर भाजपा सत्तेत आली आणि हा गणू लहानपणी तीन महिने शाखेत गेला होता एवढाच काय तो त्यांचा संबंध ! असोकोणी कशामुळे खुश व्हायचे हा ज्याचा त्याचा निर्णय. परंतु निकाल मात्र बरोबर उलटे लागलेत. निवडणुकीआधी २०० चा टप्पा पार करणार असे शहा विश्वासाने सांगत होते. अर्थात आपल्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे मनोबल वाढविणे हे त्यांचे कामच आहे. आपली खरी मजल कुठपर्यंत जाईल याचा त्या धूर्त राजकारण्याला अंदाज असणारच निश्चित. परंतु वाढवून अंदाज सांगणे, संभांचे मॉर्फ केलेले अतिरंजित छायाचित्रे प्रदर्शित करणे हे सगळे आधुनिक डावपेच वापरले गेले. गैर काहीच नाही. एवढेच कि त्या जाळ्यात काही समर्थकच अडकले आणि आता सत्ता आपलीच असा ग्रह करून बसले. मोदी-शहांनी अगदी व्यावसायिक ( प्रोफेशनल ) रित्या डावपेच आखले,पूर्ण सामर्थ्य पणाला लावले , कष्ट घेतले आणि सत्ता खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. एका सच्च्या राजकारण्याला साजेल असा.निवडणुका झाल्यावर आपल्या पुढच्या उद्योगाला रिकामे. उगाच का आणि कसे -हे रतीब घालायला वेळ पण नाही आणि तूर्त गरज पण नाही. अर्थात मुळात मोदींनी इतकी शक्ती निवडणूकांमागे लावायला हवी होती का ? हा प्रश्न उरतोच. दरम्यानच्या काळात कोरोनाने रौद्र रूप धारण केले .परंतु तो वेगळा विषय आहे. या लेखामध्ये तरी आम्ही त्यात जाऊ इच्छित नाही. थोडक्यात आता बंगाल मध्ये भगवा फडकणार म्हणून गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेवांचा पोपट झाला. भाजपने  शंभरचा आकडा ओलांडला तर आपण हा व्यवसाय सोडून देऊ असे जेंव्हा प्रशांत किशोर म्हणाले होते तेंव्हा अनेकांनी ( कदाचित शहांच्या २०० वर विश्वास ठेवून ) त्याची येथेच्छ टवाळी केली होती. शेवटी किशोर यांनी आपल्या व्यवसायाला राम राम ठोकलाच. परंतु तृणमूलला दोनशे च्या पार नेऊन !

              निवडणुकांचे निकाल पूर्णपणे जाहीरही झाले  नाहीत तर काहीजण मोदींना सत्तेवरून दूर करण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. गम्मत म्हणजे स्वतःच्या पक्षाने भोपळाही फोडला नसला तरी भाजपच्या पराभवाचा आनंद साजरा केला जात आहे. सांगलीतील हातकणंगल्याचा सदा पाटील "आता मोदीचा काय खरा नाय " म्हणून डरकाळी फोडतो. का तर कोण काळी साहेबांनी चालता चालता " काय बरा  हाय ना " असं विचारलं होतं म्हणे ! दुश्मन का दुश्मन अपना दोस्त म्हणत गल्ली मोहोल्ल्या बाहेर किंमत नसलेले नेते आणि पक्ष सुद्धा मोमोता दीदींना अभिनंदनाचे संदेश पाठवत आहेत.भाजपच्या अधिसत्तेला सुरुंग लागले , मोदींना आता अवघड जाणार , २०२४ मध्ये मोदी विरुद्ध ममता ? असले संदेश सोशल मीडियावर येऊ लागले आहेत. परंतु या अति उत्साहींना कळत नाही. मुळात मोदी आणि मोमोतांना पुढील वर्षेतरी वैर ठेवण्याचे काहीच कारण नाही. आणि दोघेही अगदी व्यवहारी राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी हातमिळवणी केली तरी आश्चर्य वाटायला नको ! मोदींविरुद्ध मोट बांधायची म्हंटली तर दीदी येतील पण. परंतु इतर पक्ष त्यांचे नेतृत्व स्वीकारणार का ? इथेच तर घोडे पेण खातंय ना ! नाही म्हणायला विरोधकांच्यात - राजकारणी आहेत जे भाजपेतर पक्षांचे नेतृत्व करू शकतात. परंतु ते सर्वमान्य नसणार. आणि निवडणुकांत सातत्याने भोपळे ना फोडण्याचे विक्रम करणाऱ्या पक्षाला आयते नेतृत्व अपेक्षित असणार. दरम्यान मोदी-शहांना हा पराभव थोडा क्लेशदायक असला तरीही मैदानात लढण्याची सवय आहे त्यांना. मुख्य म्हणजे काय-कुठे चुका झाल्या हे हेरून त्या सुधारायची इच्छा आणि पद्धत आहे.त्याचे कारण असे कि ते या अनुभवातून अनेकदा गेलेत आणि शिकत आलेत .उगाच नाही जगातला सर्वात मोठा पक्ष चालवत ते ! शिवाय विधानसभेच्या आणि लोकसभेच्या मतदानात फरक असतो. हा जसा दीदींच्या पथ्यावर पडला तास तो लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करणार. आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे - मोदी नाही तर कोण ? हा प्रश्न. आजही निवडणुका घेतल्या तरी भाजपा दुसऱ्या क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा दुप्पट ते अडीचपट जागा मिळवू शकतो. ती त्यांची ताकद आहे.आणि ती जिद्दीने आणि कष्टाने मिळवली आहे. उगाच चार ट्विट केल्याने ती नाहीशी होणार नाही. परंतु काही उतावीळ नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतात ...त्यांना कोण काय सांगणार ?

सुशांत गोसावी